शुक्रवार, २६ जुलै, २०१३

कारगिल युद्धाचे 14 वर्ष, चार हजार पाकिस्तानींना मारून रचली वीरगाथा

कारगील युद्धाला आज (शुक्रवार) १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु, तरीही या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवढीच जीवंत आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रुपात आले. त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या भारतीय सीमा चौकींवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमिवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले. यात भारतीय लष्कराचे सुमारे ३० हजार जवान सहभागी झाले. भारतील लष्कराला मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाने २६ मे रोजी ऑपरेशन पांढरा समुद्र सुरू केले. भारतीय नौदलाने समुद्रमार्गे पाकिस्तानला मिळणारी मदत रोखण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर महत्वाची जहाजे तैनात केली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक ताजे उदाहरण आहे. १९६९ मध्ये चीन आणि सोवियत संघराज्य यात झालेल्या संघर्षानंतर अण्वस्त्रसज्ज असलेल्या दोन देशांमध्ये जमीनीवर झालेले हे दुसरे युद्ध होते. या युद्धात दोन्ही देशांच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. सुरवातील पाकिस्तानने दावा केला होता, की त्यांचे केवळ ३७५ जवान ठार झाले आहेत. परंतु, नंतर स्पष्ट झाले, की पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले तर सुमारे १३०० जवान जखमी झाल्याचे समजते. केवळ एका भारतीय जवानाला पाकिस्तानी लष्कराने पकडले होते. त्याचीही नंतर सुटका करण्यात भारताला यश आले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते ३५ असा होता. ले. सौरभ कालिया यांच्यावर झालेल्या हल्ल्याने घुसखोरीची मिळाली होती माहिती कारगिल युद्धात अतिशय क्रुरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जीभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली. सुरवातील ही घुसखोरी दहशतवाद्यांची घुसखोरी असावी असे भारतीय लष्कराला वाटले होते. त्यामुळे त्यांना तेथून हुसकावून लावण्यासाठी काहीच जवान पाठविण्यात आले होते. परंतु, पाकिस्तानी जवानांनी दिलेले प्रत्युत्तर आणि इतरही भागांमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडत असल्याचे समजल्यावर घुसखोरी पाकिस्तानी लष्कराने केल्याचे उघडकीस झाले. पाकिस्तानी लष्कराने कालिया यांनी पकडून अतिशय क्रुरपणे ठार मारले. त्यांचे शारीरिक खच्चीकरण केलेले पार्थिव भारताला सोपविले. सौरभ यांचे वडील आजही त्यांच्या हत्येला दोषी असलेल्यांना शिक्षा होण्यासाठी मोठा संघर्ष करीत आहेत. बत्रा यांनी सांगितले होते, की विजयी ध्वज रोवून त्यात लपेटून येईल कारगिल युद्धात शहिद झालेले कॅफ्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून येईल. त्यांच्या कंपनीला पॉईंट ५१४० पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभुल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले. शिखर ताब्यात आल्यावर बत्रा म्हणाले होते, की ये दिल मांगे मोर. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने एेतिहासीक यश मिळवित १६ हजार फूट उंचिवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले. विमानातून पाकिस्तानी भूमिवर उतरलेले नचिकेत यांना पाकिस्तानने पकडले होते कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने केवळ एका भारतीय जवानाला पकडले होते. त्यांचे नाव फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेत असे आहे. २७ मे १९९९ रोजी नचिकेत यांनी बटालिक सेक्टरमध्ये शत्रू पक्षाच्या चौक्यांवर मिग-२७ लढाऊ विमानातून तुफान गोळीबार केला. यावेळी काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचे विमान खाली पडले. यावेळी नचिकेत यांनी स्वतःला विमानातून इजेक्ट केले. परंतु, दुर्दैवाने ते पाकिस्तानी लष्कराला सापडले. नचिकेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाला मागच्या बाजूने अचानक धक्का लागला. विमानाची गती एकदम ५०० किलोमीटर प्रति तास झाली. यावेळी विमानाच्या इंजिनला आग लागली. मी तत्काळ रॉकेट पॅड फेकून दिले. पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्कॉड्रन लिडर यांना सांगून विमानाची गती राखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अयशस्वी राहिला. त्यामुळे नचिकेत यांना विमान सोडून इजेक्ट व्हावे लागले. त्यानंतर त्यांचे विमान एका शिखरावर आदळले. नचिकेत खाली उतरल्यावर त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून प्रत्युत्तर दिले. परंतु, काही काळ चकमक झाल्यावर पाकिस्तानी जवानांनी त्यांना पकडले. त्यांना शारीरिक त्रास देऊन त्यांच्याकडून भारतीय लष्कराची गोपनीय योजना माहित करून घेण्याचा पाकिस्तानी लष्कराने प्रयत्न केला. परंतु, नचिकेत यांनी त्यांना काहीही सांगितले नाही. युद्ध संपल्यावर नचिकेत यांना पाकिस्तानने सोडून दिले. १५ मीटर अंतरावरून शत्रूशी लढत होते विजयंत थापर भारतीय लष्कराच्या राजपूताना रायफल्समध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डजन या १२ सदस्यीय टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी जवानांवर बेछुट गोळीबार केला. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खातमा केला. यात त्यांना वीरमरण आले. बॅटल ऑफ थ्री पिंपल्समध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य शहिद झाले तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले. पाकिस्तानी चौकीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी ते असे करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा