रविवार, १ सप्टेंबर, २०१३

आज सुरू झाले होते दुसरे महायुद्ध, बघा हृद्य पिळवटून टाकणारे फोटो

अमेरिकी लेखक अर्नेस्ट हॅमिंग्वे यांनी सांगितले होते, की जग खुप सुंदर आहे आणि यासाठी युद्धही तेवढेच आवश्यक आहे. कदाचित अनेकांचा या वाक्यावर विश्वास आहे. दुसरे महायुद्ध इतिहासातील एक कटू सत्य आहे. आजच्याच दिवशी 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीचा हुकूमशहा अॅडोल्फ हिटलर याने पोलंडवर हल्ला केला होता. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. यावेळी त्याच्यासोबत इटली, जापान, हंगरी, रोमानिया आणि बुल्गारिया हे देश होते. दुसरीकडे अमेरिका, सोव्हियत युनियन, ब्रिटन, चीन, फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम, पोलंड, युगोस्लाव्हिया, ब्राझिल, ग्रीस, नेदरलॅंड, न्युझिलंड, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, चेकोस्लोवाकिया, मंगोलिया हे देश होते. तब्बल सहा वर्ष चाललेल्या या युद्धात दोन्ही पक्षांचे 2 कोटी 40 लाख लष्कराची जवान तर 4 कोटी 90 लाख सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडले. अमेरिका आणि तिच्याबाजुने उभे असलेल्या देशांमधून सहा कोटी दहा लाख आणि जर्मनी व तिच्याबाजुने उभे असलेल्या देशांमधून एक कोटी वीस लाख लोक मारले गेले.

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

पत्रकारीता हा समाजाचा ‘नॉर्मल आरसा असायला हवा

@केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य नरेंद्र जाधव यांचे मत @पत्रकार संरक्षण कायदय़ाची गरज @सनसनाटी आणि नकारात्मकता दूर करा @माध्यमांनी स्वनियंत्रण आणावे अन्यथा देशाचे नुकसान @ किरण जाधव / औरंगाबाद लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्रांकडे पाहीले जाते. पण आजच्या पत्रकारीतेमध्ये नकारात्मक दृष्टीकोनही वाढतो आहे. संपादकांचे महत्व कमी होत आहे का? ग्रामीण पत्रकारांच्या समस्या काय आहेत? पत्रकारीतेला शिक्षण, प्रशिक्षणाची गरज आहे का? प्रसारमाध्यमे बेजाबादार होताय का आणि पत्रकारांचा संरक्षण कायदा अशा विविध विषयांचे पैलू घेवून औरंगाबाद येथे नुकतेच 39 वे मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन राज्यभरातील दोन हजार पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. याचा हा खास रिपोर्ट थेट औरंगाबादहून.. आजच्या पत्रकारीतेमध्ये कुठल्या विषयाची बातमी मोठी करायची की छोटी यातील तारतम्याच्या अभावामुळेच आपसुकपणे वृत्तपत्रांमध्ये सनसनाटी व नकारात्मकता वाढीस लागल्याचे चित्र दिसते आहे. वास्तविक मराठी पत्रकारीतेला एक उज्ज्वल परंपरा लाभली असून, समाजाचे खरे प्रतिबिंब मराठी पत्रकारीतेने आजवर उमटविले आहे. पण बदलत्या पत्रकारीतेचा वेध घेताना माध्यमांनी स्वनियंत्रण आणण्याची गरज आहे. अन्यथा देशाच्या विकासावरही याचा मोठा परिणम होईल, असे परखड मत केंद्रीय नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या चाळीस मिनीटांच्या भाषणात मराठी पत्रकारीतेच्या उज्ज्वल परंपरेला उजाळा देतानाच कालची, आजची व उदय़ाची पत्रकारीता यावरही विचारमंथन केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ अतिशय नेटाने काम करतोय पण या स्तंभातही अपप्रवृत्ती वाढीस लागल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. यासाठी त्यांनी पत्रकारीता ही तीन आरशांसारखी आहे. त्यामुळे पत्रकारीतेने समाजाचा नॉर्मल आरसा म्हणून काम केल्यास देशाच्या विकासाला बळ मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. डॉ. नरेंद जाधव सांगतायेत, गृहलक्ष्मीच्या संपादीका सुनिता नाईक यांना आपल्या उतारवयात रस्त्यावर जीवन जगण्याची वेळ आली, या बातमीने पुन्हा एकदा मराठी पत्रकारीतेचा विषय डोक्यात घोंगावत गेला. खरेतर पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेतलेल्या आणि गुणवत्ता यादीत आलेल्या सुनिता नाईकांवर अशी का वेळ आली याचे कोडे उलगडले नसले तरी राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन दय़ावी यावर माझे मत आता ठाम झाले आहे. भलेही पत्रकारीतेत कांही अपप्रवृत्ती घुसल्या असतील याचा अर्थ सगळेच पत्रकार तसे नाहीत. अनेक पत्रकार व त्यांचे संपादक अतिशय प्रामाणिकपणे काम करतायेत. त्यामुळे पेन्शन आणि पत्रकारांचा संरक्षण कायदा हा व्हावा ही माझीही इच्छा आहे, पण इथे त्याचे कांही अश्वासन देणार नाही, पण त्याविषयी प्रयत्न जरूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रसारमाध्यमं बेजबाबदार हा नाजुक विषय प्रसारमाध्यमं बेजबाबदार वागतायेत का? हा एक अतिशय नाजूक पण चिंतेचा व मंथन करण्यासारखा विषय असल्याची भावना नरेंद्र जाधवांनी व्यक्त केली. कारण लोकशाहीत व़ृत्तपत्रांना अनन्यसाधारण महत्व आहे. हा चौथा आता व्यापक होतो आहे. त्याचा विस्तार वाढल्याने वृत्तपत्रांची स्वताची स्वंरचना तयार झाली आहे. खरेतर 1980 पासून या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. प्रादेशिक व स्थानिक वृत्तपत्रांची मोठी भर पडली. 1991 साली नवे आर्थिक धोरण आले याचा परिणामही वृत्तपत्र सृष्टीत झाला. पण 2002 च्या विशेष गुंतवणूक धोरणानंतर तर याचा चेहरा मोहरा बदलला. वृत्तपत्रांचे सार्मथ्य वाढले. असे असले तरी पत्रकारीतेत वाढलेली अपप्रवृत्ती आणि प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारणा हा विषय नाजूक व चिंतेचा आहे. कारण पेपरमध्ये आऊट झालेली बातमी खरी यावर ऐंsशी टक्के लोकांचा विश्वास आहे. पण वृत्तपत्रांची वाढलेली स्पर्धा, बाजारीकरण, अपप्रवृत्ती यामुळे लगावबत्ती बातम्या दिल्या जातात. याचा परिणाम कुठेतरी अप्रत्यक्षरित्या देशाच्या विकासावर परिणाम करतो आहे हे विसरून चालणार नाही. सनसनाटी आणि नकारात्मक बातम्यांमुळे देशाच्या गुंतवणुकीवरही कांहीवेळा परिणाम झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. आरसा नॉर्मल असावा समाजमनाला पत्रकारीता कशी अभिप्रेत आहे हे सांगताना जाधव यांनी तीन आरशांचे उदाहरण दिले. सरळ आरसा, बर्हीगोल आरसा, अंतरगोल आरसा. या तीनही आरशातून उमटणारे प्रतिबिंब वेगवेगळे चित्र दाखवते. पण नॉर्मल तथा साध्या आरशात प्रतिमा आहे तशीच दिसते. हाच आरसा आजच्या पत्रकारीतेने वापरायला हवा. यासाठी माध्यमानी स्वनियंत्रीत राहून काम करायला हवे, असेही ते म्हणाले. पिंट मिडीया असो वा इलेक्ट्रॉनिक मिडीया असो त्यांनी एक सम्यक चित्र दिले नाही तर देशावर विलक्षण परिणाम होईल. याची अनेक उदाहरणेही त्यांनी दिली. माध्यमांचे बाजारीकरण वृत्तपत्रांना जाहीराती हव्यात, त्या मिळाव्यात पण त्याचे बाजारीकरण प्रंट पेजपर्यंत येत असेल तर तो विचार बदलायला हवा. आज अनेक ठिकाणी जाहीरातींमध्ये बातम्या शोधाव्या लागतात. प्रंट पेज न्यूज कुठे आहे असा प्रश्नही सुजान वाचकांना कित्येकदा पडतो. यातून कुठेतरी संपादक मंडळींचे महत्व अप्रत्यक्षरित्या कमी होता कामा नये. पत्रकारांचा कायदा व्हावा पत्रकारांना संरक्षण कायदा व्हावा, हा घटक देशाच्या विकासात महत्वाचे काम करतो. पण याचा निर्णय होताना तो भावनात्मक न होता कायदेशिर व्हायला हवा. आज पत्रकारांवर होणारे हल्ले हा चिंतेचा विषय आहे. याचे लोण ग्रामीण पत्रकारां पर्यंत पोहचले आहे. ग्रामीण पत्रकार हा तर आता वृत्तपत्राचा चांगला आत्मा होतोय. देशातील खेडी ते वाडीवस्तीवरचे प्रश्न पत्रकारीतेच्या माध्यमातून पुढे येतायेत ही बाब चांगली आहे. यासाठी पत्रकारांचा कायदाही चांगल्या चाकोरीतून व्हायला हवा, असेही विचार व्यक्त केले. चौकट इस्त्रालयची बातमीदारी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्रातील बातमीबाबत त्यांनी लिहून ठेवलेला अनुभव नरेंद्र जाधव यांनी सांगितला. कलाम हे राष्ट्रपती होण्यापूर्वी इस्त्राईलच्या दौऱयवर होते. ते ज्या हॉटॅलमध्ये राहीले होते, तिथे एक मोठा स्फोट झाला होता. अनेक लोक यात बळी गेले होते. नुकसान झाले होते. डॉ. कलामांना ही बातमी दुसऱया दिवशीच्या प्रत्येक पानावरची हेडलाईन असेल असेच वाटले होते. परंतु दुसऱया दिवशीचा अंक हातात आल्यानंतर त्यांना नवल वाटले. तेथील अनेक वृत्तपत्रांनी स्फोटाची बातमी आतल्या पानात दिली होती. तर तेथील एका खेडय़ात शेतकऱयांने नवे तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलेल्या उत्पादकतेच्या यशोगाथेची बातमी ही फलायर व हेडलाईन न्यूज होती. यातून त्या देशातली वृत्तपत्रे देश विकसात किती मोठी कामगिरी करतात हेच दिसून आले. इथे देशाच्या विकासाती पत्रकारीता कती महत्वपूर्ण आहे, हेच अधोरेखीत झाल्याचे सांगून पत्रकारीतेने अशा विविध विषयांचा आरसा समाजा समोर ठेवावा हे सूचित केले. शिक्षण प्रशिक्षणाची गरज आजच्या पत्रकारीतेला शिक्षण, प्रशिक्षणाची गरज आहे, हा विषय जगभर चर्चेत आहे. तो निश्चित गरजेचा आहे. ग्रामीण पत्रकारांनाही शासनाने स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मिडीयाची बेसीक माहीती तळागाळापर्यंत असायला हवी. माध्यमांना स्वनियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रेस कौन्सीलचे कामही फारसे उल्लेखनीय नसल्याचे आपल्या भाषणात अधोरेखीत केले. 1966 ला पेस कौन्सीलची स्थापना झाली. 1998 च्या ऍकट आहे. 28 लोकांच्या या कमीटीत 20 पत्रकारांचा समवेश आहे. मालक व इतर घटकांचाही समावेश आहे. या कौन्सीलकडून चांगल्या अपेक्षा आहेत. या अधिवेशनात मुंबईच्या महीला छायाचित्रकावर झालेल्या हल्ल्याचा काळय़ा फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहीजे या घोषणा देण्यात आल्या. यावेळी एस. एम. देशमुख, किरण नाईक, प्रमोद माने, बाबा सुर्यवंशी, माधवराव आंबोरकर, संजय वरकड, सुनील ढेपे यांच्यासह मराठवाडय़ातून प्रसिध्द होणाऱया विविध दैनिकांचे संपादक, पत्रकार तसेच राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

प्रशासकांच्या काळातच जत कारखान्याचा लिलाव

राष्ट्रवादीच्या रॅलीची काँग्रेसला धडकी भरली ः आ. प्रकाश शेंडगे परतीच्या वाटेवर ः आबांचा मोठेपणा म्हणूनच प्रांत कार्यालय @ जत / प्रतिनिधी जत साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी राष्ट्रवादीने मोर्चा काढावा, असे आव्हान देणाऱया जत काँग्रेसला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युउत्तर देण्यात आले आहे. बुधवारी जत राष्ट्रवादीने पत्रकार बैठक घेवून पाच वर्षे कारखाना काँग्रेस प्रशासकांच्या ताब्यात होता, त्यांच्याच काळात कारखान्याचा लिलाव झाला. पालकमंत्र्यांनीच काँग्रेसचे प्रशासक कारखान्यावर बसविले. मग त्याच काळात त्यांना उसाचे एक कांडेदेखील गाळप करता आले नाही, त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करून दीशाभूल करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. बुधवारी जत पंचायत समितीच्या सभागृहात काँग्रेसच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने जंबो पत्रकार बैठक घेतली. यावेळी सभापती बसवराज बिरादार, जि.प.सदस्य संजीवकुमार सावंत, उपनगराध्यक्ष उमेश सावंत, आर. के. माने, कार्याध्यक्ष शिवाजीराव ताड, अध्यक्ष ऍड.बसवराज धोडमणी, मारूती पवार, रमेश बिरादार, सुनील पवार, श्रीकांत शिंदे, सौ. सुशिला होनमोरे, लक्ष्मणराव बोराडे, आकाराम मासाळ, विठ्ठल निकम, बाळ सावंत, प्रमोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. संजीवकुमार सावंत म्हणाले, 16 तारखेला राष्ट्रवादीने जत ते सांगली अशी एक हजार मोटर सायकलींची रॅली काढली होती. या रॅलीला मिळालेला प्रतिसाद तसेच 4 एप्रिलला विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा पाहूनच जत काँग्रेसच्या छातीत धडकी भरली आहे. जगतापांचे वर्चस्व पाहूनच या मंडळींच्या पायाखालची वाळू घसरली असून, येनकेन प्रकारे राष्ट्रवादीला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खरेतर 1988 सालीच विलासराव जगतापांनी म्हैसाळ पाण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी एक हजार लोकांना अटक करवून घेतली. हे पाणी त्यावेळी काँग्रेसवाल्यांना दिवास्वप्न वाटत होते. त्यांनी प्रतिमोर्चा काढून विरोध नोंदविला. परंतु आज म्हैसाळचे पाणी आल्यावर हीच मंडऴी श्रेयासाठी पुढे आली आहेत. जत कारखान्या संदर्भात केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उलट सुरूवातीच्या काळात साडे पाच लाख टन उसाचे गाळप केले. कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न जगतापांनी केले. त्यासाठी सहा वर्षे करारांनी तो राजारामबापूला चालविण्यास दिला, त्यांनी दोन हंगाम यशस्वी चालविले. त्यानंतर मात्र जतच्या काँग्रेस मंडळींनी पालकमंत्र्यांना सांगून कारखान्यावर प्रशासक आणला. उमाजीराव सनमडकीर पाच वर्षे प्रशासक होते. त्यांच्या काळात एक कांड गाळप केले नाही. त्यांच्याच काळात कारखान्याचा लिलाव झाला. त्यावेळी ही मंडळी व त्यांचे मंत्री कुठे होते असा पलटवारही राष्ट्रवादीने केला. इतकेच काय कारखान्यात यांची सत्ता येत नाही म्हणून उस कवठेमहांकाळला घालण्याचे षडयंत्र रचले, तसा प्रकारही केला. जतच्या विकासाचा मानबिंदू बंद पाडण्याचे पाप काँग्रेसनी केले आहे. शिवाय 40 कोटी कारखान्यावर कर्जे होते, ते शंभर कोटी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली. ज्या काँग्रेसवाल्यांना यंत्रमाग चालविता येत नाही, त्यांनी कारखान्यावर बोलू नये. मोर्चा काय असतो माहीत आहे का सभापती बसवराज बिराजदार म्हणाले, काँग्रेसवाल्यांना मोर्चा काय असतो हेच माहीत नाही. जतच्या प्रश्नासाठी विलासराव जगतापांच्या नेतृत्वाखाली शेकडो मोर्चे, आंदोलने, उपोषणे झाली. जनतेच्या प्रश्नासाठी ते आजवर तळमळीने लढले आहेत. मोर्चे आम्ही काढायचे. रस्त्यावर आम्ही उतरणार, प्रश्नांची अभ्यासू मांडणी आम्ही करायची आणि श्रेयासाठी काँग्रेस पुढे ही त्यांची जुनी पध्दत आहे. आतातर विधानसभा डोळय़ासमोर ठेवून हे लोक पालकमंत्र्यांना खुष करण्यासाठी बेताल वक्तव्ये करीत आहेत. ज्यावेळी पलूस कडेगावचे विभाजन झाले, त्यावेळी पालकमंत्री व जतची काँग्रेस कुठे होती. आता जतचा पुळका आणणारे व जतला दत्तक घेतले म्ह्णून सांगणाऱया पालकमंत्र्यांनी नियोजन समितीच्या निधीत का जतला खाली ठेवले याची खुलासा त्यांनी करावा असे सांगून जतच्या रस्त्यांसाठी त्यांनी 70 कोटी रूपये द्यावेत अशी मागणी सभापती बिरादार यांनी केली. येळवीत दीशाभूल ः आर. के. माने येळवीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुसऱयांदा उद्घाटन घेवून काँग्रेसनी दीशाभूल केली आहे. वास्तविक दिलीप वाघमोडेंच्या काळात आम्हीच पुढाकार घेवून हे केंद्र मंजूर करून घेतले होते. या केंद्राचे उद्घाटन विलासराव जगताप, जि.प.अध्यक्ष अमरसिंह देशमुख, बसवराज पाटील, संजय सावंत, सुनील पवार यांच्या उपस्थितीत झाले होते. आता याऐवजी एखाद्या नव्या कामाचे उद्घाटन केले असते तर ते शोभले असते असा टोला आर.के.मानेंनी लगावला आहे. आबांचा मोठेपणा ः सुनील पवार प.सदस्य सुनील पवार म्हणाले, विलासराव जगताप यांनी पुढाकार घेवून आर.आर.पाटील यांना प्रांत कार्यालयासाठी व म्हैसाळ योजनेसाठी आग्रह धरला होता. आबांचा मोठेपणा म्हणूनच जतला प्रांत कार्यालय मिळाले. प्रांत कार्यालयाचे गॅझेट होताना पालकमंत्री कुठे होते असे सांगून म्हैसाळच्या 42 गावांचा सर्व्हे करण्याचा आदेशही जगतापांच्या प्रयत्नांमुळे आबांनी दिला आहे. आ. शेंडगे परतीच्या वाटेवर बोराडे आ. प्रकाश शेंडगे हे आता परतीच्या वाटेवर आहेत, त्यामुळे त्यांनी कारखाना सभासदांचा होईल वगैरे केलेले वक्तव्य दीशाभूल करणारे आहे. चार वर्षात आमदार जतेत दिसले नाहीत. रविवार ते रविवार हा त्यांचा कार्यक्रम जनतेला कळला असल्याचे बोराडे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकाश जमदाडे लवकरच राष्ट्रवादीत येतील. त्यांनी यावे त्यांचे आम्ही स्वागत करू, असे सांगितले.

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३

2014जत विधानसभेची जागा काँग्रेसलाच!

@डॉ. पतंगराव कदमांचे सूतोवाच @आ. शेंडगेंनी आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केले @कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश फोटो ः ना. डॉ. पतंगराव कदम यांचा वापरणे...ा @ किरण जाधव / जत 2009 मध्ये पहिल्यांदाच खुल्या झालेल्या जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला गेली होती. त्यामुळे सष्टेंबर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा कोणाला मिळणार याकडे जतेच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असतानाच, राज्याचे वनमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी जतची जागा काँग्रेसलाच घेणार असल्याचा दावा केला आहे. श्रावण सोमवारी मिळालेल्या या गोड बातमीने जत काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरी डॉ. कदमांच्या वक्तव्यामुळे जतेची राजकीय समीकरणे मात्र गतीमान होणार हे पक्के झाले आहे. सोमवारी सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदमांनी दुष्काळी जतचा दौरा केला. जतला लागेल ती मदत करण्याचे अभिवचन देतानाच त्यांनी तोंडावर आलेल्या विधानसभेची जागा आता राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसलाच घेणार असल्याचा बाँम्ब फोडून जतेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली आहे. इतकेच काय आता जत काँग्रेसनी नेटाने कामाला लागावे, एकसंघ काँग्रेस कामाला लागली तर भविष्यात जतमधील सर्वच संस्थावर काँग्रेसचा झेंडा दिसेल, असे सांगून जतची जागा कुठल्याही स्थितीत सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खरेतर पालकमंत्री डॉ. पतंगराव कदमांच्या या वक्तव्यामुळे भविष्यातील जतेच्या राजकीय मैदानावरचे अनेक संदर्भ अधोरेखीत केले आहेत. राज्याच्या विधीमंडळात अनेक वर्षांपासून विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळणारे व राज्यातील वजनदार तथा ज्येष्ठ मंत्री म्हणून डॉ. पतंगराव कदमांचा मोठा दबदबा आहे. राजकारणात अनेकदा भाकीते करावी लागतात, त्याप्रमाणे सोमवारचे भाकीत डॉ. कदमांनी केले असले तरी त्याला तितकेच महत्व आहे. कारण जतेच्या काँग्रेसवर दादा घराण्यापेक्षा कदम घराण्याचे वर्चस्व अनेक वर्षांपासून आहे. जिकडे कदम तिकडे बहुतांशी जतची काँग्रेस हे देखील अनेकदा सिध्द झाले आहे. शिवाय काँग्रेसच्या फादर बॉडीतील ज्येष्ठ नेते म्हणून पक्षातही त्यांचे मानाचे स्थान आहे. एकेकाळी जिल्हय़ातील सहा आमदारांचा भक्कम पाठींबा असणारे, मोहनराव कदमांना दोनवेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खेचून घेणारे व जतवर विशेष प्रेम दाखविणारे मंत्री कदम यांनी केलेले वक्तव्य नेहमीच्या स्टाईलने विसरून जाण्यासारखे अजिबात नाही. कारण मागच्या दोनेक वर्षांपासून डॉ. कदमांनी जतवर बारीक लक्ष केंद्रीत केले आहे. जत काँग्रेसचे शिष्टमंडळ सतत त्यांच्या संपर्कात असल्याचे विविध प्रश्नातून दिसून येते आहे. विस्कटलेली जत काँग्रेसची घडी ते बसवित आहेत. त्यामुळे जत विधानसभेची जागा काँग्रेस सहजा सहजी सोडेल असे वाटत नाही. या दौऱयात त्यांनी 2014 च्या निवडणुकीचे अनेक संदर्भ जोडताना इथले कार्यकर्ते कसे आहेत, याचेही स्पष्टीकरण केले. जत काँग्रेसने मला सोडून कधीही विरोधाची भूमिका घेतली नाही. जिल्ह्य़ाची व तालुक्याची राजकीय बेरीज घालताना सुनीलबापू सारखा कार्यकर्ता मोठय़ा हिंम्मतीने सदस्यांना घेवून यायचा त्यामुळे मी त्याच्यावर रूसलो तरी तो माझा लाडका आहे. उमाजीराव सनमडीकरांच्या हाती नेहमीच तालुक्याचे नेतृत्व दिले. त्यांनीही हिंमतीने काम करून दाखवले. सनमडीकरांच्या पराभवामुळे तालुक्याचे नुकसान झाले. पी. एम. पाटील चांगला कार्यकर्ता आहे, पण जरा बिळुरातून बाहेर पडून तालुक्यात त्यांनी फिरले पाहीजे. सनमडीकर इथल्या कार्यकर्त्यांचे शेलारमामा आहेत. सारखं आजारी आजारी म्हणून आता थांबून चालणार नाही सनमडीकर नेटाने काम करा असा गोडीत आदेशही त्यांनी देवून टाकला. दरम्यान, जत काँग्रेस आता चांगल्या वळणावर आली आहे. गटबाजीमुळे आपलेच नुकसान होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते एकोप्याने कामाला लागले आहे. त्यामुळे जतेत काँग्रेसला चांगले वातावरण तयार झाले आहे. खरेतर 2009 च्या निवडणुकीतच जर गटबाजी झाली नसती तर इथे काँग्रेसचा आमदार दिसला असता. पण माझेच जरा दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीला गेली. पण इथली काँग्रेसमंडळी लई बेरकी निघाली. त्यांनी पक्षाचे राजीनामे देवून भाजपाच्या प्रकाश शेंडगेंना आमदार करून दाखविले. प्रकाश शेंडगे तंतोतंत वागले 2009 च्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे आमदार झाले तर त्यांनी काँग्रेस कमीटीच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे. निधीचे वाटप इथल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून करायचे असे ठरले होते. प्रकाश शेंडगे भाजपाचे असले तरी त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम केले नाही. काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी तंतोतंत काम केल्याचा श्रेणी एकचा शेरा शेंडगेंना देवून टाकला. पण 2014 ला अण्णांचे काय याबाबत ते अजिबात बोलले नाहीत. उलट जत काँग्रेस कमिटी सांगेल त्यालाच उमेदवारी देण्याचे डॉ. कदमांनी जाहीर केले. एकुणच सोमवारच्या दौऱयात पालकमंत्री डॉ. कदमांनी जत काँग्रेसला चांगलेच रिजार्च केले आहे. जतची जागा काँग्रेसचीच ही गोड बातमी दिली. कृषी महाविदय़ालय जतलाच देण्याची ग्वाही देवून थेट मुख्यमंत्र्यांना फोनवरून बोलूनही घेतले. तालुक्याचे विभाजन लवकरच करण्याचे संकेत दिले. म्हैसाळमध्ये सर्व गावे समाविष्ट करण्याचा निर्णयही घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. इतक्यावर न थांबता त्यांनी 2014 च्या विधानसभेसाठी आपण भिलवडी वांगीपेक्षा जतच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेवू असे सांगून जत विधानसभेची तुतारीच वाजविली आहे.

बुधवार, ७ ऑगस्ट, २०१३

‘कवठेपिरान’ देशाचे लक्ष वेधणार

@ सांगली / प्रतिनिधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेपिरान ता. मिरज येथील ग्रामस्थांनी आता नव्याने या अभियानात सहभाग घेऊन देशातील एक आदर्श ‘रोल मॉडेल’ गांव बनविण्याचा चंग बांधला आहे. याची सुरूवात गुरूवारी दहा हजार वृक्षलागवड करून करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आदर्श सरपंच पै. भीमराव माने यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली. सद्याचे गृहमंत्री आणि संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता अभियानांचे जनक आर. आर. पाटील यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. या अवाहनास प्रतिसाद देताना आपल्या सरपंच पदाच्या कार्यकालात आम्ही हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. आणि तो तडीसही नेला. याचे चांगले फळ आम्हाला मिळाले. 2003-04 या साली गावाला ग्रामस्वच्छता अभियानाती राज्यातील पहिले बक्षिस प्राप्त झाले. तर आपणाला आदर्श संरपंचाचा पुरस्कार देऊन शासनाने गौरविले. गावाला ग्रामस्वच्छता अभियानांची आवड आहे. पून्हा एकदा गावाने हे अभियान राबविण्याचा निर्धार केला आहे. ग्रामस्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षपदाची धुरा गावातील महिलांनी सौ. अनिता माने यांच्याकडे सोपविली आहे. गावातील महिलांनीच हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याची सुरूवात गुरूवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते 10 हजार वृक्षलागव करून करण्यात येणार आहे. या वृक्षलागवडीत गावातील 700 महिला सहभागी होणार आहेत. या शिवाय पुढील आठवडय़ात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित अभियानाची जनजागृती आणि व्यसनमुक्तीसाठी मशाल मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणूक गावातील दोन हजार महिला सहभागी होणार असल्याचेही भीमराव माने यांनी स्पष्ट केले. अभियान यशस्वी करण्यासाठी गावातील महिला आपपाल्या वार्डातील गटारी स्वता स्वच्छ करीत आहेत. या शिवाय महिलांनीच गावात प्लॅस्टीक बंदी केली आहे. गावातील सुमारे दोन हजार महिलांनी प्रत्येकी पाच रोपे लावून ती जगविण्याची जबाबदारी घेतली आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी गावात काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. गावात गुटखा आणि मावा विक्री पूर्णत बंद करण्यात आली आहे. ग्रामस्वच्छता अभियान समितीच्या अध्यक्षा सौ. अनिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली गावात बालसंसार वर्ग सुरू करण्यात आला असून यामध्ये 300 शालेयविद्यार्थी सहभाग घेतला असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून गावातील संपूर्ण गावातील गल्ली बोळातील रस्ते पेव्हींग ब्लॉकने करण्यात येणार आहेत. सद्या 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम येत्या काही महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. यापैकी दलीतवस्ती सुधार योजनेतून करण्यात येत असलेल्या पेव्हींग ब्लॉकच्या कामाचे उद्घाटनही डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात येणार आहे. गावात बचत गटांची संख्या चांगली आहे. आता शासन आदेशानुसार या बचत गटांचा महासंघ करून बचत गटांना उद्योग उभे करून देण्यासाठी यापुढच्या काळात प्रयत्न करणार असल्याचेही माने यांनी सांगितले. अभियानांतर्गत गावातील प्रत्येक घर पून्हा एकाच रंगाने रंगविण्यात येणार आहे. तर प्रत्येक गल्ली बोळात वेलीचे मंडप उभे करण्यात येणार आहेत. जकार्तावीर हिंदकेसरी मारूती माने यांचे गावात स्मारक पूर्ण होत नाही तोपर्यत आणि गावात 102 कोटी रूपयाची विकास कामे मार्गी लागत नाही तोपर्यत पायात चप्पल न घालण्याचा निर्णय आपण हिंदकेसरी मारूती माने यांच्या पुण्यतिथी दिनी घेतला आहे. ग्रामस्वच्छता अभियानास ग्रामस्थांच्यामधून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या स्पर्धेत राज्याचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच संपूर्ण देशात एक ‘रोल मॉडेल’ गाव बनविण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचेही पै. भीमराव माने यांनी सांगितले.

दुष्काळी जत तालुक्यावर अन्यायाची मालिका सुरूच

प्रांत कार्यालय कवठय़ाला आणखी एक दणका @..तर कर्नाटकात जाण्याची मागणी का चुकीची?@विभाजनाचेही तसेच, म्हैसाळचे रामायण जैसे थे @सरकारला आता ठोस निर्णय घ्यावे लागतील किरण जाधव / जत महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे नेतृत्व करणाऱया मंत्र्याचा जिल्हा म्हणून बिरूदावली मिरवणाऱया सांगली जिल्हय़ातील दुष्काळी जत तालुक्यावर येथीलच नेतृत्वांकडून सातत्याने अन्याय होतो आहे. काय पाप केले असेल म्हणून जतेत जन्माला आलो ही भावना घेवून जगणारा हा तालुका आता आपल्या न्याय व हक्कांसाठी झुंजतोय, भांडतोय पण त्याकडे डोळे झाकलेल्या सरकारचे जराही लक्ष नाही. जतवरच्या अन्यायाची मालिका आजही सुरूच आहे. यामुळे जतेत संतापाची लाट उसळली आहे. सांगली जिल्हय़ाच्या पूर्वेला असणारा जत तालुका स्वातंत्र्यापासून आजअखेर विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करतोय. इथल्या भोळय़ा भाबडय़ा जनतेची पिळवणूक करणे, त्यांना केवळ उसतोडी व मजुरीसाठी आरक्षीत ठेवणे हे जणू सुत्रच झाले की काय अशी अवस्था जतकडे पाहील्यानंतर वाटते. लोकाभिमुख कारभार, मंत्र्यांवरचा दबाव, हक्कांसाठी जागृती करणाऱया इथल्या नेतृत्वाचीही मुस्कटदाबी करण्याचा प्रकारही सुरूच आहे. लोकांनी जरा उठाव केला की त्यांना खोटी अश्वासने देवून दाबून ठेवण्याचा प्रकारही वाढीस लागला आहे. याला येथील स्थानिक नेतेही बळी पडतात हे देखील एक दुर्देव मानावे लागेल. सलग चार वर्षांपासून भीषण दुष्काळाचा मुकाबला करणारा जत तालुका आता मात्र विविध प्रश्नांच्या माध्यमातून पेटून उठला आहे. याला कारणंही अनेक आहेत. इथे दुष्काळ कायमच आहे, सकाळ आलेलाच नाही. त्यामुळेच आजच्या घडीला तिकडे पूर्व भागातील 42 गावांनी पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष उभा केला आहे. त्याअगोदर याच भागातील लोकांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षांपर्यंतचे लोक मराठीची अस्मीता जपण्यासाठी आले. पण जतकरांच्या पदरात काय पडले याचे उत्तर ते ही देवू शकणार नाहीत. खरेतर 123 गावे 250 हून अधिक वाडय़ावस्त्या, हजारो एकराची जमीन, द्राक्ष, बोर, डाळींबासारख्या पीकाला अनुकूल हवामान, हिम्मतवान शेतकरी आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या भाषेचा एक चांगल्या विचारांचा प्रांतीक पूल निर्माण करून जगणाऱया जतवरच का सतत अन्यायाचा आसूड ओढला जातोय. जिल्हय़ाचा ऐंशी टकके भाग समृध्दीच्या छायेखाली असताना जत आटपाडीसारख्या 20 टक्के भागाचा विकास करण्याची भावना मायबाप सरकारच्या मनात कधी येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतका मोठा असणारा तालुका गेली कित्येक वर्षे विभाजनाची मागणी करतोय. या तालुक्याचे विभाजन होत नाही. या विभाजनाला आता संख का उमदी ही लावलेली झालर बाजूला करण्याची गरज आहे. आंध्रांचे उग्र आंदोलन झाल्यानंतर एका राज्याची निर्मीती होते. पण एका तालुक्याची निर्मीती होत नाही. याचा किती मोठा परिणाम जतेच्या विकासावर होतोय याचाही विचार केला जात नाही. प्रस्ताव शासनाच्या गुंडाळीत बांधून ठेवून जतकरांना झुलवण्याचा उदय़ोग कोण थांबिवणार. केवळ विभाजन नसल्याने आज तालुका विकासात तर सोडाच मानव विकास निर्देशांकातही घसरणीवर आहे. म्हैसाळचीही दुर्देवी अवस्था जतच्या दृष्टीने पाणी हा जीवनमरणाचा विषय होवून बसला आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील जत तालुक्यात घोटभर पाण्यासाठी मैलानं मैलची भटकंती वर्षानुवर्षे सुरू आहे. ज्या योजनेच्या आशेवर ही जनता जगतेय, तीतही अन्याय सुरू आहे. या योजनेचा सामजंस्य करार पाळला जात नाही. लोक तहानेने व्याकुळ असताना पश्चिमेचे तालुके नव्या योजना यात घूसडून दबावाने पाणी नेतायेत. निधी पळवतायेत, त्यांचा एका दिवसात प्रस्ताव तयार होतो, कोटय़वधीचा निधी मिळतो योजना मार्गी लागतात. पण इथे बिळूर व देवनाळसारख्या भागाच्या टेंडर प्रक्रीयेला संघर्ष करावा लागत आहे. पूर्व भागाने तर पाण्याची आशाच सोडली आहे. कधी हे लोक हिरेपडसलगीचे गाजर दाखवतात, कधी बबलेश्वर सांगतात नुसती उठाठेव व भावनात्मक मार्केटींगच चालवले आहे. यामुळे संतापलेल्या लोकांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली, त्यात गैर वाटण्याचे कारण तरी काय असा सवाल आज तालुकावासिय व्यक्त करतायेत. कारण पूर्व भाग उद्धवस्त झाला तरी सरकार तिकडे लक्ष देत नाही, हा अन्याय नाही का ? प्रांत कार्यालयाचा दणका प्रांत कार्यालयाच्या बाबतीतही आता शासनाने आणखी एक दणका जतला दिला आहे. जिल्हय़ाच्या केंदापासून 150 ते 200 किलोमीटर अंतरावर असणाऱया लोकांच्या सेवेच्या दृष्टीने हे प्रांत कार्यालय जतलाच हवे होते. तसा प्रस्ताव महसूलच्या सर्व्हेत झाला होता. तरीही पुन्हा वजनाखाली तो कवठय़ाला गेला. तातडीने गॅझेट बाहेर पाडण्यात आले, यासारखे दुर्देव कोणते असू शकते. आता सर्वपक्षीय पुढारी या प्रश्नी आक्रमक झाले आहेत. आंदोलनाची धार त्यासाठी तीव्र केली आहे. यावर शासनाला फेरविचार करावाच लागेल. कारण प्रांत कार्यालय जतलाच हवे. जत हे मध्यभागचे पेंद्र आहे. तिकडे कवठय़ाकडून 40 किमी. तर उमदीकडून 50 किमी अंतरावर आहे. शिवाय कांही उपविभागीय कार्यालये जतलाच असताना हा दुजाभाव कशासाठी व कुणाच्या हटटापायी, कुणाच्या संमतीने होतोय याचे उत्तर जतकरांना दय़ावेच लागेल. चौकट सगळंच ओरबडू नका जिल्हय़ातील मंत्र्यांनी जतला न्याय देण्याची भूमिका ठेवायला हवी. किती ओरबडायचे यालाही मर्यादा आहेत. तुरचीला पोलीस प्रशिक्षण केंद्र झाले. वनमंत्र्यांनी एक प्रोजेक्ट त्यांच्या तालुकयात आणला. इस्लामपूर विकासात सबसे आगे सबसे तेज आहे. मग जतला आलेले एखादे प्रशासकीय कार्यालय तरी ठेवा, ही भावना जतकरांची आहे. पाटणप्रमाणे स्वतंत्र दय़ा मुख्यमंत्र्यांनी दोन तालुक्यांसाठी एक प्रांत कार्यालयाची घोषणा केली. 15 ऑगस्टपासून ही कार्यालये सुरू होत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या जिल्हय़ातील पाटण तालुक्यात स्वतंत्र प्रांत कार्यालय सुरू केले आहे, त्याच धर्तीवर येथे स्वतंत्र कार्यालय दिल्यास भविष्याच्या दृष्टीनेही सोयीचे होणार आहे. कारण आज ना उदय़ा जतेचे विभाजन होईल. शिवाय मागे महसूलमंत्र्यांनी माडग्याळला समांतर महसूल कार्यालय सुरू करण्याचा विचार शासन करीत असल्याचे स्पष्ट केले होते. ठोस निर्णय घेण्याची गरज जत विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावेत. पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. अतिशय मागास असणाऱया तालुक्यासाठी विशेष निधीची गरज आहे. येथील रस्त्यांची तर अवस्था शब्दबध्द करण्याइतकी सिमीत नाही. तालुका, माणसं उठण्याची वेळ न येवू देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत जनतची जनता व्यक्त करतेय!

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

एक होते भगवानदादा!

भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा यांची एक ऑगस्ट ही जन्मशताब्दी. मध्यमवर्गीय मराठी घरात जन्मलेल्या भगवानदादांचं आयुष्य एक दंतकथा वाटावं असंच होतं. चित्रपटाच्या वेडापायी दादांनी चौथी इयत्तेमध्येच शाळेला रामराम ठोकला आणि स्टुडिओचा रस्ता धरला. तो जमाना होता मूकपटांचा. परंतु, चित्रपटांत काम मिळणं सोपं नव्हतं. त्या काळातील अभिनेते मास्टर विठ्ठल हे भगवानदादांचं दैवत. त्यामुळे चित्रपटात स्टंटबाजी, फाइट सीन्स करायची स्वप्नं पाहत भगवानदादांनी आपल्या शरीरावर, व्यायामावर मेहनत घ्यायला सुरवात केली. त्यांना रजतपटावर सर्वप्रथम चमकण्याची संधी मिळाली, ती 1930 मध्ये निर्माता सिराज अली हकीम यांच्या "बेवफा आशिक' या मूकपटामध्ये. मात्र हा चित्रपट यशस्वी होऊनही या चित्रपटानंतर आठ-नऊ महिने भगवानदादांना नवे चित्रपट मिळण्यासाठी स्ट्रगल करावा लागला होता. आणखी काही मूकपटांमध्ये त्यांनी कामे केली. भगवानदादांचा पहिला बोलपट होता, "हिम्मत-ए-मर्दा.' नंतरच्या काळात भगवानदादा लोकप्रिय अभिनेता तर बनलेच; शिवाय त्यांनी चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शन यामध्येही नाव कमावले. आपल्या "जागृती पिक्‍चर्स' या चित्रपट संस्थेद्वारा त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. इतकंच नाही, तर त्यांनी चेंबूर परिसरात स्वतःचा "जागृती' स्टुडिओ उभारला होता. चित्रपटनिर्मिती -अभिनय यांद्वारा भगवानदादांनी भरपूर पैसे कमावले. त्या काळात जुहू चौपाटी परिसरात त्यांचा 25 खोल्यांचा बंगला होता आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगळी, असा सात गाड्यांचा ताफा त्यांच्याकडे होता. मात्र, हे दिवस बदलायला वेळ लागला नाही. "अलबेला' हा सुपरहिट चित्रपट बनवल्यानंतर भगवानदादांनी "लाबेला', "झमेला' या चित्रपटांची निर्मिती केली; पण हे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर पार गारद झाले. किशोरकुमारला घेऊन बनवीत असलेल्या "हसते रहना' या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, की चित्रपटाचे नाव "हसते रहना' असले, तरी त्यांच्यावर रडायची पाळी आली. कारण या चित्रपटासाठी त्यांनी आपली सर्व बचत, बायकोचे दागिने खर्च केले; एवढे करूनही चित्रपट पूर्ण झालाच नाही. आणि काही काळातच बंगला, गाड्या विकून भगवानदादा दादर टी. टी. येथील दोन खोल्यांच्या चाळीत राहू लागले. एके काळी जेवणाच्या, दारूच्या पार्ट्यांसाठी त्यांच्या बंगल्यात जमत असलेली मंडळी, ते कफल्लक झाल्यावर त्यांना भेटीनाशी झाली. मग भगवानदादांनी चित्रपटात साइड रोल, छोट्या भूमिका करायला सुरवात केली. मात्र, त्यांच्या मद्यपानाच्या सवयीमुळे अनेक निर्माते पैशांऐवजी दारूच्या बाटल्या देऊन त्यांची बोळवण करीत असत. मात्र, भगवानदादांसारखे नृत्य करता यावे, म्हणून अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा हे कायम धडपडत राहिले. फार कमी लोकांना माहिती असेल, की भगवानदादा हे उत्तम ज्योतिषी होते. अत्यंत श्रीमंती थाटात राहिलेल्या भगवानदादांनी दोन खोल्यांमध्ये राहणेही तितक्‍याच सहजतेने स्वीकारले होते. सुनील दत्त, ओमप्रकाश, राजेंद्रकृष्ण, सी. रामचंद्र आदी चित्रपटसृष्टीतील फार कमी लोकांनी निर्धन झालेल्या भगवानदादांशी संपर्क ठेवला होता. दिलीपकुमार गाडीतून दादर टी.टी.च्या रस्त्यावरून जात, त्या वेळी भगवानदादांच्या चाळीजवळ गाडी आल्यावर मोठ्याने गाडीचा हॉर्न वाजवत आणि भगवानदादांना हात करीत असत. आज भगवानदादा जाऊन 11 वर्षे झाली, तरीही त्यांचे विनोदी चित्रपट, त्यांची नृत्यशैली, "अलबेला' चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनात ताजी आहेत. प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांना गीतकार म्हणून पहिला ब्रेक भगवानदादांनी दिला होता. त्यांच्या "भला आदमी' या चित्रपटाच्या नामवलीमध्ये आपले नाव पाहिल्यावर आनंद बक्षी यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले होते. पुढे बक्षींना बऱ्यापैकी नाव मिळाल्यावर भगवानदादांना ते एका फिल्मी पार्टीमध्ये भेटले, त्या वेळी दादा बक्षींना म्हणाले होते, ""बक्षीसाहेब, या चित्रपटसृष्टीमध्ये नाव नाही, तर काम माणसाला जिवंत ठेवतं.'' आणि म्हणूनच भगवानदादा त्यांच्या चित्रपटांद्वारा, नृत्यशैलीमुळे आजही जिवंत आहेत.

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

जतपूर्वची 42 गावे पाण्यासाठी फोडताहेत टाहो!

@ किरण जाधव / जत हिरेपडसलगीची तुतारी बंद पडल्यानंतर बबलेश्वरचा बिगूल वाजवून जतेच्या पूर्व भागातील 42 गावांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे चालढकल करणाऱया येथील पुढाऱयांसह शासनाला वठणीवर आणण्याचा चंग आता खुद्द नागरिकांनीच बांधला आहे. मागच्या तीन महिन्यापासून जत पूर्वच्या 42 गावांच्या पाणीप्रश्नाची ठिणगी चांगलीच पेटली आहे. उमदीच्या पाणी संघर्ष समितीने यासाठी पुढाकार घेतला असून, कर्नाटकचे पाणी मिळो अगर न मिळो हक्काच्या म्हैसाळ योजनेत 42 गावांचा समावेश झालाच पाहिजे यासाठी पुकारलेल्या आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा देत मागच्या तीन महिन्यांपासून वेगवेगळय़ा प्रकारचे आंदोलन करणाऱया उमदी पाणी संघर्ष समितीला लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. एक ऑगस्टला उमदीत झालेला रास्ता रोको, गाव बंद, निषेध मोर्चा आणि नाकर्ते शासनाचे घातलेले श्राद्ध व त्यासाठी उपस्थित झालेल्या पाच हजार जनसमुदायांनी जिह्याचेच नव्हेतर संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले आहे. यापुढचा टप्पा म्हणून नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी 42 गावांमध्ये मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेत जोवर समावेश होत नाही, तोवर या आंदोलनाची दिशा आणखीन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पुढाऱयाच्या पुढारपणाला बगल देऊन लोकांनी सुरू केलेले हे आंदोलन आता एक व्यापक जनचळवळीच्या दिशेने जाताना दिसते आहे. यामुळे जत पूर्व भागाचा प्रश्न चांगलाच एwरणीवर आला आहे. यावर शासनाला आता तोडगा काढावाच लागेल किंबहुना तो शक्य तितक्या लवकर सोडविण्याची गरजदेखील आहे. कारण दुष्काळी जत तालुक्याला वरदायी ठरणारा म्हैसाळ प्रकल्पाच्या पूर्णत्वाची तिसरी पिढी वाट पाहात आहे. अवघ्या 82 कोटीची योजना शासनाच्या कासव कामकाजामुळे आज दोन हजार कोटींच्या पुढे गेली आहे. खरेतर दुष्काळी भागाला पाण्याचा प्रथम प्राधान्यक्रम देण्याचा विचार व्हायला हवा होता. पण, तसे झालो नाही. उलट राज्याच्या मंत्रीमंडळात ज्याचे वजन अधिक तिथेच सातत्याने मोठा निधी गेला. नदीकाठापासून काही अंतरावर असणारी गावं मागच्या काही वर्षांपासून म्हैसाळचे पाणी पित आहेत. तिथला पीक पॅटर्न बदलला, लोक सुधारले. पण, जिह्याच्या पूर्वेला असणारा जत तालुका पाण्यावाचून तडफडत असतानाही त्यांची जराही कीव येत नाही, इतकेच काय तर या योजनेचा सांमजस्य करारही पाळला जात नाही हे या तालुक्याचे दुर्देवच मानावे लागेल. वास्तविक आज म्हैसाळ कार्यन्वित झाली आहे. किमान येथील 15 ते 20 गावांमध्ये तरी पिण्यापुरते पाणी आले आहे. त्यामुळे या योजनेच्या पूर्णत्वाची वाट बऱयापैकी मोकळी झाल्याचे चित्र आहे. यासाठी गतवर्षभरात जे जतेत जनआंदोलन व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले त्याला यश आले आहे. परंतू, एवढय़ावर थांबून चालणार नाही. कारण जतेचा पूर्व भाग आजही कोरडा ठणठणीत आहे. घसा भिजला आत्म्याचे काय? जतेचा उंबरठा ओलांडून कृष्णेने प्रवेश केला आहे. तिने नुसता प्रवेश न करता कोरडेला ओलावा देत सांगोल्यापर्यंत पोहोचली आहे. जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास करून कृष्णा सांगोला मंगळवेढय़ापर्यंत जातेय. मग, जतेच्या पूर्व भागातील 42 गावांपर्यंत का पोहोचत नाही, असा संतप्त सवाल या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. जतेचा घसा ओला करणारी ही योजना आत्म्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. ज्या 42 गावांना धड कर्नाटकातूनही पाणी येत नाही किंबहुना तो प्रश्न दोन राज्यांचा असल्याने तो फार लवकर सुटले असे अजिबात नाही. त्यामुळे मुळ व हक्काच्या म्हैसाळ योजनेत या गावांचा समावेश करावा ही मागणी पुढे आली आहे. आंदोलनाची सुरूवात शिव बसव जयंतीपासून उमदीच्या पाणी संघर्ष समितीने हे आंदोलन पुकारले. येथील कार्यकर्ते सुनील पोतदार, अनिल शिंदे, सुभाष कोकळे, हणमंत दुधगी यांनी या प्रश्नाची जागृती केली. दर महिन्याच्या एक तारखेला उमदीत निषेध सभांचे आयोजन केले. जतच्या पूर्व भागात पाणी आले पाहीजे हा विचार रूझविला. त्यामुळे एकेक गावातून चांगला प्रतिसाद मिळत गेला. पहिल्या टप्यात 12 गावांनी येणाऱया लोकसभा व विधानसभेवर बहिष्कारचा निर्णय घेतला. त्यानंतर विविध आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्याची भूमिका चालविली आहे. पूर्वभागात भीषण दाहकता जत पूर्व भागाची दाहकता खूप मोठी आहे. ज्या भागातील जमिनी चांगल्या आहेत. शेतकरी मोठे आहेत. निसर्गाशी दोन हात करून जिद्दीने राबणारा येथील बळीराजा पाण्याअभावी मात्र हतबल झाला आहे. शंभर एकराचा शेतकरी उसाच्या फडावर जातोय. गावंच्या गावं उठण्याची वेळ आली आहे. चार वर्षात पावसाचा थेंब नाही. पाण्याची पातळी हजारो फुटावर गेली आहे. बागा उद्धवस्त झाल्या. जनावरं कसाबाच्या दावणीला चालली. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती तर नित्याचीच बनली आहे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असताना मायबाप सरकार मात्र त्यांना नव्या अश्वासनाशिवाय काहीच देत नाही. मध्यंतरी हिरेपडसलगीचा विषय पुढे आणला. त्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्नही केले. मुख्यमंत्र्यांनी दहा कोटीची घोषणा केली. या दहा कोटीतील दमडीही मिळाली नाही, तोवर बबलेश्वरचा बिगूल वाजविण्यात आला. परंतू, ज्या योजना कल्पनेच्या पलिकडेच्या आहेत. शिवाय तो दोन राज्यांचा प्रश्न आहे. तिकडे कर्नाटक अतिरिक्त पाण्याची मागणी करून हा विषय पुढे ढकलतोय, अशा योजनांच्या मागे लागून वेळ ढकलण्याचा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. ही भावना पूर्व भागातील जनतेची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता चांगलाच धुमसतोय. क्रांतीदिनी मशाल रॅली एक ऑगस्टला सुमारे हजारो लोकांनी उमदीत रास्तो रोको करून शासनाचे श्राद्ध घातले. आता पुढचा टप्पा म्हणून नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी 42 गावांमध्ये मशाल रॅली काढण्यात येत आहे. त्यादिवशी शासनाच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत. निवृत्ती शिंदे, सुनील पोतदार, अनिल शिंदे, सुभाष कोकळे, सुरेश कल्लोळी, मल्लय्या मठपती, चंद्रय्या मठ, राजू धोत्री, चिदानंद रगटे, बाळू शिंदे, सिद्धलिंगय्या पाटील, दावल शेख, महंमद कलाल, आण्णा भुयार, मलकारी वायचळ, तांबोळी गुरूजी, राजकुमार येळमळी, बाबू वागदरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी गट तयार करून या रॅलीचे आयोजन केले आहे. त्यानंतर निषेध सभा घेवून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

जत साखर कारखान्याचे धुराडे पेटणार!

@नोंव्हेंबरपासून गाळप, तीन लाख गळिताचे उददीष्ट @दुरूस्तीचे काम अंतिम टप्यात @स्थानिकांनाच रोजगाराची संधी,कर्मचारी भरती सुरू @ किरण जाधव / जत जत तालुकयाच्या विकासाचा मानबिंदू ठरलेला येथील राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखान्याचे धुराडे तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा पेटणार आहे. अवसायनात गेलेला कारखाना इस्लामपूरच्या राजारामबापू युनिटने खरेदी केल्यानंतर या कारखान्याच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्यात आणले असून नोंव्हेबरपासून कारखान्यातून साखर गाळपाचे काम सुरू होणार आहे. यंदा तीन लाख टन साखर गाळपाचे उददीष्ट कारखान्याने घेतले आहे. यामुळे जतेच्या विकासाला गती मिळणार आहे. जत तालुकयाच्या विकासात आणि राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱया जतच्या साखर कारखान्याने स्थापनेपासून अनेक चढउतार पाहीले आहेत. कधी या कारखान्याने गोड साखरेचे गाळप केले तर कधी राजकीय कडवटपणाही बाहेर पाडला. यामुळे जत शुगरच्या धुराडय़ातून ज्या विकासाच्या अपेक्षा आजवर तालुक्यातील जनतेला होत्या, त्या पूर्ण होवू शकल्या नाहीत. जत कारखान्याने जतला काय दिले तर याचे उत्तर सभासदांनाही मिळणार नाही इतका राजकीय चिखलात व कुरघोडीत तो अडकला होता. वास्तविक सभासदांच्या मालकीचा असणारा कारखाना का बंद पडला, कर्जाचा बोजा का वाढला, तो अवसायानात का गेला, प्रशासकांच्या काळात काय झाले, त्याची विक्री का झाली याचे रामायण महाभारात तालुकावासियांनी अनुभवले आहे. त्यामुळे या शिळय़ा प्रश्नांच्या कडीला उत आणण्यापेक्षा आता तो कोणी का असेना नव्या दमाने सुरू करतोय ही बाब तालुक्याच्या विकासाच्या व हिताच्या दृष्टीने खूपच महत्वाची आहे. खरेतर ज्या मातीत कुसळंसुध्दा उगवत नव्हती अशा फोंडय़ा माळावर साखर कारखाना उभा राहीला हे त्याकाळच्या दृष्टीने महत्वाचे होतेच, पण आजच्या घडीला तो आणखीन चांगला आहे. कारण आता जतेच्या शिवारात कृष्णेचे पाणी येण्याची वाट बऱयापैकी मोकळी झाली आहे. शिवाय या तालुक्यातील शेतकरी नेहमीच सकारात्मक विचारांनी शेती कसतोय व उसासारख्या पीकाला आता हुकमी दर मिळत असल्याने दुष्काळी पटटय़ातील शेतकऱयांच्या आर्थिक समृध्दीला बळ मिळणार आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे मागे हाच कारखाना आर्थिक कोंडीत अडकल्यानंतर तो राजारामबापू कारखान्याला करारांनी चालविण्यास दिला होता. सन 2006ः 2007 च्या सालात त्यांनी अवघ्या 29 दिवसात बंद कारखान्याची मशिनिरी सुरू करून हंगामही यशस्वी केला होता. त्यावेळेस 3 लाख 84 हजार इतके गाळप केले होते. तर सन 2007 ः 2008 ला एक लाख 61 हजार या कारखान्यातून गाळप झाले होते. त्यानंतर राजकीय कुरघोडीत कारखाना बंद राहीला. या कारखान्यावर प्रशासक आणण्यात आले होते. वर्षभरापूर्वी मात्र हा कारखाना राजारामबापू युनिटने खरेदी केला. तेंव्हापासून कारखान्याच्या कामकाजाला नव्याने गती मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर उदय़ोगात राजारामबापू कारखान्याचे नाव आघाडीवर आहे. शिवाय ज्या पध्दतीने इस्लामपूरला कारखान्याच्या माध्यमातून विकास साधण्यात आला. त्याचपध्दतीने जतेचा विकास साधण्याचा मानस या युनीटने केला आहे. त्यामुळे मागच्या सहा महीन्यांपासून कारखाना परिसराचे रूपडे बदलण्याची प्रक्रीया गतीने सुरू आहे. आजवर कारखाना इमारतीचे नूतनीकरण, बॉयलर नूतनीकरण करण्यात आले आहे. मशिनरी, सिव्हील व इंजिनीअरींगची कामेही अंतीम टप्यात आली आहेत. विदय़ुतीकरण पूर्ण झाले असून, कर्मचाऱयांच्या ईमारती सुसज्ज व अदय़ायावत, रस्त्यांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 300 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱयांच्या मुलाखती पूर्ण गत आठवडय़ात या कारखान्यासाठी लागणाऱया तंत्रज्ञ कर्मचाऱयांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्यांची भरती प्रक्रीयाही सुरू करण्यात आली आहे. कारखाना प्रशासनाने स्थानिकांना प्राधान्य देण्याचे धोरण ठेवले आहे. शिवाय पूर्वी जे कामगार येथे होते, त्यांनाही प्राधान्य देण्यात येत असल्याचे येथील अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. तीन लाख गाळपाचे उददीष्ट 2500 क्षमतेच्या जत शुगरचे गाळप नोंव्हेंबरपासून होत आहे. यंदा तीन लाख गाळपाचे उददीष्ट घेण्यात आले आहे. तर सध्यस्थितीत जत तालुक्यात जवळपास तीन हजार एकरावर उस लागवड असून, यात वाढ होण्याच्या दृष्टीने कारखान्याने कृती आराखडा तयार केला आहे. ठिबक तंत्रज्ञानावर उस शेती विकसीत करण्याचे महत्वपूर्ण उददीष्टही हाती घेण्यात आले आहे. भविष्यात को जनरेशन व डिस्ट्रीलरी प्रकल्पही येथे उभे राहणार आहेत. त्याचबरोबर सध्या कारखाना परिसरात तीन हजार वृक्षलागवड करण्यात येत आहे. एकुणच जतेच्या विकासाला गती देणारा एक मोठा प्रकल्प लवकरच नव्याने सुरू होत आहे. यामुळे निश्चितच जतेच्या औदय़ागिक, शेती, उदय़ोगाला गती मिळणार हे मात्र निश्चित..!

बुधवार, ३१ जुलै, २०१३

‘तासगाव’च्या विक्रीस उच्च न्यायालयाचा नकार

तासगाव साखर कारखाना विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला असून, यामुळे गणपती जिल्हा संघ व राज्य सहकारी बँकेस आणखी एक मोठी चपराक बसली आहे. बुधवारी हा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने जाहीर केला. तासगाव कारखान्याचे अवसायक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते संदीप राजोबा यांनी सभासदांच्यावतीने तासगाव कारखाना विक्री विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत तासगाव साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने गणपती जिल्हा संघास कमी किंमतीत विकला आहे. त्या विक्रीस स्थगिती मिळावी, यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बरेच महिन्यापासून यावर युक्तिवाद सुरू होता. मात्र, मागील सुनावणी दरम्यानच न्यायालयाने विक्री करू नये, असे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र, नेमकी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली नव्हती. गणपती जिल्हा संघाने बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एम.कानडे व न्यायमूर्ती श्रीराम यांच्या खंडपीठासमोर संघाचे वकील आशितोष कुंभकोणी व अजित कुलकर्णी यांनी पुणे डीआरटीने तासगाव कारखाना अवसायकांची याचिका फेटाळली असून गणपती जिल्हा संघास हा कारखाना खरेदी करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी अवसायकांच्यावतीने न्यायालयात उमेश मानकापुरे म्हणाले, उगार शुगरला कारखाना दोन वर्षे चालवण्यास दिला होता. मात्र, दोन हंगामानंतर बेकायदेशीररित्या हा कारखाना शिखर बँकेने प्रायव्हेट टीटीच्या आधारे गणपती जिल्हा संघास साडेचौदा कोटीस विकला होता. यासाठी शासनाचीसुद्धा संमती नव्हती. सहकार खात्याच्या सर्व नियमांची पायमल्ली करण्यात आली होती. कारखान्याची एकूण मालमत्ता 100 कोटी असताना गणपती जिल्हा संघास साडेचौदा कोटी रूपयास तो कसा देण्यात आला? यामुळे यात मोठा गैरप्रकार घडला आहे, असे नमूद केले. यावेळी सोनहिरा साखर कारखान्याच्यावतीने बोलताना ऍड. प्रसाद दाणी म्हणाले, राज्य सहकारी बँकेने एक वर्षासाठी तासगाव कारखान्याची निविदा काढली. त्यात ‘सोनहिरा’ने 10 कोटीची निविदा भरली आहे. सोनहिरा एक वर्षात दहा कोटी देत असेल तर पाच वर्षासाठी गणपती जिल्हा संघास हा कारखाना साडेचौदा कोटीस कसा देण्यात आला? आमची बोली सर्वाधिक असल्याने हा कारखाना ‘सोनहिरा’ला चालविण्यास मिळावा, अशी मागणी केली. सभासदांच्यावतीने बाजू मांडताना ऍड. अमित साळे म्हणाले, हा कारखाना गणपती जिल्हा संघास चालविण्यासाठी देताना अनेक गैरप्रकार झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने हा कारखाना गणपती जिल्हा संघास देण्यात आला आहे. सर्व परिस्थिती पाहता हा कारखाना दीर्घ मुदतीवर चालवण्यासाठी द्यावा व तो नंतर सभासदांचा व्हावा, अशी मागणी केली. यावेळी न्यायमूर्ती कानडे व न्यायमूर्ती श्रीराम यांनी सर्वांची मते विचारात घेऊन तासगाव साखर कारखाना विक्री करण्यास नकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. पुढील आठवडय़ात होणाऱया सुनावणीत सर्व याचिकांचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यावेळी संदीप राजोबा, सत्याण्णा, दीपक मगदूम यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते. अवसायक वाय.पी.गिरींची उपस्थिती गेली दोन महिने झाले तासगाव साखर कारखान्याचे अवसायक वाय.पी.गिरी विषयी सभासदांमध्ये एक वेगळेच माहोल उठले होते. अवसायकपदी नेमणूक झाल्यानंतर ते एकदासुद्धा कोणत्याही सुनावणीसाठी उपस्थित राहिले नव्हते. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते पहिल्यांदाच अवसायकाच्या भूमिकेत दिसून येऊन सुनावणीच्यावेळी ते उपस्थित होते. याची चर्चा सभासदांमध्ये सुरू होती.

सहकार क्षेत्राचा दीपस्तंभ ः लोकनेते राजारामबापू पाटील

सहकार क्षेत्राचा दीपस्तंभ ः लोकनेते राजारामबापू पाटील लोकनेते राजारामबापू यांचे जीवन म्हणजे सार्वजनिक जीवनातील कार्यकर्तृत्वाचा मोठा पर्वत आहे, या कार्यकर्तृत्वाचे जे-जे म्हणून पैलू आहेत, त्यांचा मागोवा घेतला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी विकासकार्यासाठी सहकाराच्या माध्यमाचा प्रभावीपणे अवलंब केला. सहकार क्षेत्रात त्यांनी सर्वांगीण विकासाचे जे गौरवशाली कार्य केले, त्यामागे लोकसेवेची दृढ भावना होती. शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी बापूंनी भगिरथ प्रयत्न केले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्यकर्तृत्व महत्वपूर्ण आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱयांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. सहकार क्षेत्राचे मूळ सूत्र शेतकरी असला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी विविध संस्थांचा विकास केला. राज्यातील सहकार चळवळीला प्रदीर्घ परंपरा आहे. जुन्या सांगली संस्थानातही या सहकार प्रणालीवर आधारित काही संस्था चांगल्याप्रकारे काम करत होत्या. स्वातंत्र्याचा सूर्योदय झाल्यावर जसे अनेकविध उपक्रमांनी त्या सूर्याचे स्वागत झाले. तसेच ते ‘सहकार तत्वावरील नवनव्या प्रकल्प उभारणीतून’ही झाले, कारण स्वातंत्र्यानंतर जनसामान्यांचा जीवनस्तर उंचावणे मोठे आव्हान होते. ‘विना सहकार नही उद्धार’चा उद्घोष झाला, तो स्वराज्याचे सुराज्य व्हावे, या कल्पनेतूनच झाला. सर्वधर्मसमभाव-एकता-बंधुता या संकल्पना सहकारामध्ये सामावल्या आहेत आणि त्यादृष्टीने सहकाराची थोरवी रूजवणारे जे नेते विकासकार्यात अग्रेसर राहिले, त्या मालिकेत लोकनेते राजारामबापू पाटील यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. सहकाराच्या आधारावर बापूंनी घडवलेल्या विकासाचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. राज्याचा विकास आणि प्रगतीची बांधिलकी राजारामबापूंनी मंत्रिपदावरून घेतलेल्या अनेक निर्णयामधून दिसून येते. सहकार क्षेत्रातील शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यास बापूंनी उद्योगमंत्रीपदाच्या कालावधीत चालना दिली. 1967 मध्ये त्यांनी राज्याच्या उद्योग खात्याची जबाबदारी स्वीकारली. या कालावधीत त्यांनी ग्रामीण भागात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यावर भर दिला, यामागे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची क्षमता वाढावी, हा त्यांचा दृष्टिकोन होता. औद्योगिक वसाहती उभा करण्याच्या बापूंच्या धोरणामुळे आज विकसनशील भागातील औद्योगिकीकरण वाढत आहे, त्यांचे हे धोरण म्हणजे औद्योगिक विकासाचा महत्वाचा टप्पा ठरला आहे. वीज मंत्रीपदाच्या कालावधीत बापूंनी शेतीला वीजपुरवठा करण्याच्या धोरणावर भर दिला. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी ओळखली होती. भविष्यकाळातील महाराष्ट्र विकासाची व्हिजन त्यांच्याकडे होती, याचे हे ठळक उदाहरण आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीही अशीच व्हिजन विकसित केली आणि प्रशासकीय कौशल्याचा ठसा निर्माण केला. विकासाचे एक रोल मॉडेल त्यांनी निर्माण केले. राज्यविकासात ते आज अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत. लोकनेते राजारामबापूंनी शेतकरी आणि सामान्यांसाठी सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाना, बँक, दूध संघ, ग्राहक भांडार, सूतगिरणी, पतसंस्था, दूध संस्था आणि पाणीपुरवठासारख्या संस्था उभारून आणि त्या यशस्वी करून, समग्र विकास साधला, हे आज सर्वमान्य झाले. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे सहकाराचे आद्य तत्व आहे, त्यातल्या-त्यात सबलांनी दुर्बलांना आधार देऊन, त्यांना स्वावलंबी करणे, त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे सहकाराचा आत्मा आहे. लोकसेवेचे हे माध्यम लोकनेते राजारामबापूंनी समग्र जीवनात प्रभावीपणे वापरले आणि अविरत लोकसेवा केली, म्हणूनच त्यांना ‘लोकनेते’ या सन्मानाने गौरवले गेले आहे. ज्या-ज्या सहकारी संस्था बापूंनी उभ्या केल्या, त्या सहकाराचा उद्घोष करणाऱया आहेत. राज्यभर बापूंनी कार्यकर्त्यांना सहकाराची प्रेरणा दिली. कवठेमहांकाळसारख्या अवर्षणग्रस्त भागात शेतकरी संघटन व्हावे, त्यांना बळ प्राप्त व्हावे, म्हणून बापूंनी महांकाली सहकारी साखर कारखाना उभारण्याची प्रेरणा दिली. सहकारातून विकासाचे काम करणाऱया व्यक्ती असोत वा संस्था, त्यांच्या पाठीशी ते सक्रीयपणे उभे राहात. 1961 मध्ये साखराळे येथील सहकारी साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली, हा राजारामबापू साखर कारखाना आज कृषी विकासाचा विलक्षण यशस्वी असा ‘राजारामबापू पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो. या कारखान्याकडून जी उल्लेखनीय कामगिरी घडत आहे, त्यामागे लोकनेते राजारामबापूंची दूरदृष्टी आहे. ऊस उत्पादन केवळ साखरेसाठी नसून, उपपदार्थनिर्मिती केली, तरच साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील, हे बापूंनी 1983 मध्येच ओळखले आणि आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील पहिल्या ऍसिस्टोन प्रकल्प उभारणी साखराळे येथील साखर कारखान्यात केली, या प्रकल्पाच्या स्थापनेवेळी साखर कारखान्यांनी उपपदार्थनिर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते, त्याचे महत्व आज समजून येते. 97व्या घटनादुरूस्तीनंतर राज्याच्या सहकार कायद्यात झालेल्या बदलांमुळे सहकार क्षेत्रात आता नवा अध्याय सुरू झाला आहे. सहकार चळवळ मोठय़ा कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या सहकार चळवळीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत, या पार्श्वभूमीवर लोकनेते राजारामबापू पाटील यांची 94वी जयंती होत आहे. ‘सहकारातून उद्धार’ या तत्वाचे साक्षात दर्शनच बापूंनी कार्यातून घडवले. त्यांची कार्यपद्धती आणि विचार अथांग सागरावरील दीपस्तंभाप्रमाणे आहेत. या प्रकाशात लोकविकासासाठी बापूंनी दाखवलेल्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा वसा कार्यकर्त्यांनी जोपासत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे.

सोमवार, २९ जुलै, २०१३

जयवंत पाटीलसह बाराजणांना आजन्म कारावास- जाधव बंधू खून खटला

सुनील ढोकळे निर्दोष ःन्यायालया बाहेर उत्सुकता व तणाव ः गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार, काहीजण ताब्यात @इस्लामपूर / प्रतिनिधी संपूर्ण सांगली जिल्हयाचे लक्ष लागून राहिलेल्या उमेश भिमराव जाधव (34) व महेश भिमराव जाधव (32) या बंधूंच्या खून प्रकरणातील आरोपी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील त्याचा भाऊ माणिक यांच्यासह बारा आरोपींना सोमवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.तर एकजणाची निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रा. ना. सरदेसाई यांनी ही शिक्षा दिली. इस्लामपूर न्यायालयात एका गुन्हयात इतक्या जणांना शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी होती. गर्दी पागवण्यासाठी पोलिसांनी अधून मधून सौम्य लाठीमार करताना अनेकांना ताब्यात घेतले. जयवंत आनंदराव पाटील (40) माणिक आनंदराव पाटील (37), गणेश प्रताप उर्फ संजय पाटील, धनाजी लक्ष्मण पाटील, सचिन उर्फ पिंटू प्रताप उर्फ संजय पाटील (35) बबल्या उर्फ इंद्रजित रंगराव पाटील (25), संतोष नारायण कणसे (27), उदय उर्फ खंडया रामचंद्र पवार, उत्तम लक्ष्मण पाटील, देवेंद्र उर्फ देवदत्त जयसिंग पाटील(35) सचिन विजय ढोकळे, सुधाकर राजाराम माने (37), या बाराजणांना खून प्रकरणी दोषी धरून न्यायाधीश सरदेसाई यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर सुनील विजय ढोकळे याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खूनात पंधरा आरोपीचा सहभाग होता. पण सुशांत सुभाष पाटील व अभिमन्यू उर्फ बबल्या बाळासाहेब पाटील हे बालगुन्हेगार असल्याने त्याचवेळी या गुन्हयातून बाहेर पडले होते. पाच वर्षे दहा महिन्यापूर्वी झालेल्या जाधव बंधूच्या खूनामुळे संपूर्ण वाळवा तालुका हादरून गेला होता. तर सुनावणी सुरू झाल्यापासून या खून खटल्याकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले होते. ऑक्टोबर 2011 पासून सुरू झालेली ही सुनावणी प्रदिर्घकाळ चालली होती. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांचा यामध्ये समावेश असल्याने सोमवारी निकालाची उत्सुकता ताणली होती. सकाळी आकरा वाजल्यापासूनच न्यायालय परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली होती. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालय इमारतीपासून बऱयाच अंतरावर पोलिसांनी गर्दीला रोखून धरले होते. न्यायालयाच्या इमारतीतही पोलिसांनी लोकांना खात्री करून सोडले होते. न्यायाधीश सरदेसाई यांच्या न्यायदान कक्षात वकील, पत्रकार व जाधव बंधू यांचे नातेवाईक वगळता कुणालाही सोडले नव्हते. जसजसा वेळ सरकेल, तसतशी न्यायदान कक्षाबरोबरच बाहेर गर्दीतही उत्सुकता, हूरहूर व तणाव होता. दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी न्यायाधीश सरदेसाई आसनस्थ झाले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश भोसले, फिर्यादी मदार जाधव यांचे वकील ऍड. प्रकाश हिलगे (कोल्हापूर) ऍड. भोसले यांचे असिस्टंट ऍड. आनंद शिर्के हे हजर झाले. बारा वाजून 17 मिनिटांनी आरोपींना न्यायदान कक्षात बोलावून घेण्यात आले. दरम्यान संतोष कणसे याच्यासह जामिनावर असलेले आरोपी बाहेर गर्दीत अडकल्याने आले नव्हते. त्यांना हजर करण्यात आल्यानंतर कामकाजाला सुरूवात झाली. न्यायाधीश सरदेसाई यांनी सुरूवातीलाच फार्याद व अन्य कागदपत्रांत सुनील ढोकळे याचा अधिक उल्लेख नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करीत असल्याचे सांगितले. यावेळी जयवंत व माणिक पाटील हे पिजऱयात उभे होते. तर अन्य दहा आरोपी ओळीने पाठीमागे उभे होते. न्यायाधीश सरदेसाई यांनी बारा जणांना दोषी धरून शिक्षेबद्दल काय सांगायचे आहे का? अशी विचारणा सर्व आरोपींना केली. तेव्हा जयवंत याच्यासह सर्वानीच मानेनेच नकार दर्शवला. यावेळी आरोपींच्या वकीलांनी आरोपींच्या वयाचा व पत्नी-मुलांचा विचार करून कमीत कमी शिक्षा दयावी, तसेच आरोपी जयवंत, माणिक, गणेश, व अन्य आरोपी एकाच कुटुंबातील असल्याने त्याचाही विचार व्हावा, असा युक्तीवाद केला. दरम्यान त्यांनी मागील काही निकालांचे लेखी दाखले दिले. यावेळी सरकारी वकील सुरेश भोसले यांनी हा गुन्हा अपवादात्मक स्वरूपाचा असून भर दिवसा, भर वस्तीत दहशत निर्माण करून दोघा बंधूचे आरोपींनी खून केले आहेत. त्यामुळे त्यांना अधिका-धिक शिक्षा व्हावी असा युक्तीवाद केला. दरम्यान फिर्यादी मंदार यांचे वकील हिलगे यांनी या घटनेवेळी मृत जाधव यांच्या हातात कसलेही शस्त्र नव्हते. दोघेही राष्ट्रीय हॉकी खेळाडू होते. ते सशक्त व कर्ते होते. त्यांच्या खूनामुळे कुटुंबियांना धक्का बसला. दोघांच्या विधवा पत्नी व चार लहान मुले यांच्या पालन पोषणासाठी नुकसान भरपाई मिळाली असा युक्तीवाद केला. सुनावलेली शिक्षा न्यायाधीश सरदेसाई यांनी बारा जणांना खूनाच्या गुन्हयाखाली जन्मठेप व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न दिल्यास दोन महिने सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद केली. याशिवाय बेकायदा जमाव जमवणे या गुन्हयाखाली. तीन महिने सक्तमजुरी पाचशे रूपये दंड, दंड न दिल्यास एक महिना साधी कैद धारदारशस्त्रs बाळगल्या प्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी, पाचशे रूपये दंड, दंड न भरल्या एक महिना साधी कैद,शस्त्रs घेवून दुकानात घुसल्या प्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी एक हजार रूपये दंड, दंड न दिल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तर जयवंत व माणिक या दोघांना बेकायदा रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रूपये दंड, व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा दिली. या दोघांसह गणेश पाटील याला आर्म ऍक्टखाली एक वर्ष सक्तमजुरी एक हजार रूपये दंड व दंड न दिल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा दिली आहे. दरम्यान कट रचल्याच्या आरोपातून बाराही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सर्व शिक्षा एकत्रीत भोगावयाची असून कारागृहात भोगलेल्या शिक्षेची सूट देण्यात येणार आहे. न्यायाधीश सरदेसाई यांनी आरोपींना प्रत्येकी तीन हजार रूपये केलेला दंड नुकसान भरपाई म्हणून मृताच्या विधवा पत्नींना देण्याचे आदेश दिले आहेत. तर या गुन्हयातील रिव्हॉल्वर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून त्याची कायदेशीर विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. दोषारोपापासून चौथे न्यायाधीश या गुन्हयाचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश दिलीप खोत यांच्या न्यायालयात दि. 5 ऑगस्ट 2010 रोजी दाखल झाले. त्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी जाधव बंधू यांचे चुलत भाऊ मंदार यांनी हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे जिल्हा सहय्यक सरकारी वकील सुरेश पाटील यांच्याकडे या खटल्याची जबाबदारी देण्यात आली त्यांनी काही पंच व साक्षीदारांना तपासले. त्यानंतर खटल्याचे काम बरेच पुढे सरकल्यानंतर त्यांना तडकाफडकी बदलून त्यांच्या जागी सुरेशचंद्र भोसले यांची नियुक्ती केली. त्यानंतर तीन न्यायाधीशांसमोर या खटल्याची सुनावणी चालली.