शनिवार, २७ जुलै, २०१३

पूर ओसरू लागला

उघडिपीमुळे विसर्गात कपात कोयना, वारणा, कण्हेरमधून 65 हजार क्युसेस विसर्ग, अलमट्टीचा विसर्ग दोन लाख 54 हजार क्यूसेस ः कर्नाळ रस्ता अजून बंद कोयना, वारणा, कण्हेर आणि धोम धरणातून विसर्ग कमी केल्याने आणि पाऊस थांबल्याने कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांना आलेला पूर आता ओसरण्यास प्रारंभ झाला आहे. आयर्विन पुलाजवळ रविवारी पाणीपातळी 35 फुटावर जाईल आणि नंतर ती झपाटय़ाने उतरेल असा अंदाज आहे. पाऊस थांबल्यामुळे पुराची भीतीही संपली आहे. पुरामुळे शहरातील कर्नाळ रस्ता अजूनही बंद आहे. तर सूर्यवंशीनगर, इनामदार प्लॉट येथे पाणी आहे. कोयना धरणाचे दरवाजे 12 फुटानेच उचलले असून विसर्ग कमी झाला आहे. तो 54 हजारवर करण्यात आला आहे. जिह्यात बहे, ताकारी आणि भिलवडी येथे पाणी उतरले आहे. वारणा धरणातूनही विसर्गही निम्म्यावर आणला असून तो 16 हजार 191 क्युसेसवरून आठ हजारवर करण्यात आला. कण्हेर धरणातून दोन हजार 443 क्युसेस विसर्ग होत आहे. तर धोम धरणातून फक्त 300 क्युसेसने सुरू आहे. जिह्यात शनिवारी पाऊस थांबला आहे. पूर कमी करण्यासाठी अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तेथून दोन लाख 54 हजार क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणेची पाणीपातळी मोठय़ा प्रमाणात कमी होत चालली आहे. जिह्यातील कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यावर परिणाम करणाऱया कोयना, वारणा, धोम आणि कण्हेर या चारही धरणातील पाणीसाठा गेल्या 13 दिवसापासून झपाटय़ाने वाढला होता. पण, या धरणातून विसर्ग करण्यात आल्याने ही धरणे आता 90 टक्क्यावरून ती कमी होऊन 85 वर आली आहेत. 13 दिवसापासून कोयना आणि नऊ दिवसापासून वारणा आणि आता सहा दिवसापासून कण्हेर धरणातून तर तीन दिवसापासून धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या चारही धरणातून मिळून एकूण 65 हजार क्यूसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 90 हजारवरून तो इतका कमी केल्याने ही पाणीपातळी उतरत आहे. कराड येथे आता पातळी तीन फुटाने उतरली आहे. सांगलीत कृष्णेची पातळी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्थिर होती. सकाळी 38 फूट असणारी पातळी सायंकाळी 38 फुटावरच होती. जिह्यात रिपरिप थांबली आहे. त्यामुळे शहरातील जामवाडी या भागातील पाणी ओसरणार आहे. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट याठिकाणी पाणी शिरल्याने 45 कुटुंबाचे स्थलांतर झाले आहे. या कुटुंबांना महापालिकेच्या शाळा नंबर 25 व शाळा नंबर एक येथे ठेवण्यात आले आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे वारणेला पूर आला आहे. भरतवाडी- कणेगावचा संपर्क तुटला आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने विसर्ग निम्म्यावर आणल्याने वारणेची पातळी झपाटय़ाने उतरणार आहे. शिराळा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क अजूनही तुटला आहे. शिराळा तालुक्याबरोबरच वाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठच्या शेतीत पाणी पसरले आहे. हरिपूर येथे वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावर पाणीपातळी मात्र वाढली आहे. कोयना धरणातून विसर्ग कमी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग फक्त 54 हजार इतकाच होत आहे. रविवारी विसर्ग कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. या कोयना धरणांतील पाणीपातळी कमी झाल्याने तो थांबवण्यात येणार आहे. कृष्णा नदीतून आयर्विन पुलाजवळून सेकंदाला 88 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अंकली पुलाजवळ एक लाख 25 हजार क्युसेसने सुरू आहे. अलमट्टी ः दोन लाख 54 हजारने विसर्ग वारणा आणि कृष्णेतील पाणीपातळी स्थिर राहण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्गही त्या प्रमाणात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तेथून आता सेकंदाला दोन लाख 54 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात पाणी दोन लाख 25 हजार क्युसेसने येत आहे त्यामुळे अलमट्टी धरणांची उंची 517.60 वर स्थिर ठेवण्यात येत आहे. अलमट्टीमधून दुप्पट वेगाने पाणी सोडल्याने पाण्याची पातळी स्थिर राहत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी कोयना येथे 53, महाबळेश्वर 51 आणि नवजा येथे 40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात एकूण 86.71 टीएमसी पाणीसाठा असून धरण 82 टक्के भरले आहे. वारणा धरणात 29.26 टीएमसी पाणीसाठा झाला आहे धरण 85 टक्के भरले आहे. धोम धरणात 10.77 आणि कण्हेर धरणात 8.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कण्हेर धरणातून तीन हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या चारही धरणातील पाणीपातळी आता स्थिर झाली आहे. कृष्णा आणि वारणेचीही पाणीपातळी कमी होत आहे. बहे याठिकाणी कृष्णेची पाणीपातळी 12 फूट झाली होती ताकारी येथे 42 फूट 6 इंच झाली होती. भिलवडीत 41 फूट 6 इंच होती आयर्विन पुलाजवळ सकाळी ती 38 फूट सहा इंच होती ती सायंकाळी 38 फूटच राहिली आहे. अंकली येथे पातळी 43 फुटावर गेली आहे. जिह्यात शनिवारी इस्लामपूर येथे पाच मि.मी., पलूस दोन, तासगाव येथे पाच, सांगली दोन, शिराळा 11, मिरज येथे 0, विटा येथे सहा, आटपाडी येथे 0, कवठेमहांकाळ येथे दोन, जत येथे सहा आणि कडेगाव येथे पाच मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कृष्णेची पाणीपातळी बहे- 12 फूट, ताकारी - 42 फूट आठ इंच भिलवडी - 41 फूट सहा इंच आयर्विन - 38 फूट अंकली - 42 फूट चार इंच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा