सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३
प्रशासकांच्या काळातच जत कारखान्याचा लिलाव
राष्ट्रवादीच्या रॅलीची काँग्रेसला धडकी भरली ः आ. प्रकाश शेंडगे परतीच्या वाटेवर ः आबांचा मोठेपणा म्हणूनच प्रांत कार्यालय
@ जत / प्रतिनिधी
जत साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी राष्ट्रवादीने मोर्चा काढावा, असे आव्हान देणाऱया जत काँग्रेसला राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युउत्तर देण्यात आले आहे. बुधवारी जत राष्ट्रवादीने पत्रकार बैठक घेवून पाच वर्षे कारखाना काँग्रेस प्रशासकांच्या ताब्यात होता, त्यांच्याच काळात कारखान्याचा लिलाव झाला. पालकमंत्र्यांनीच काँग्रेसचे प्रशासक कारखान्यावर बसविले. मग त्याच काळात त्यांना उसाचे एक कांडेदेखील गाळप करता आले नाही, त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करून दीशाभूल करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
बुधवारी जत पंचायत समितीच्या सभागृहात काँग्रेसच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने जंबो पत्रकार बैठक घेतली. यावेळी सभापती बसवराज बिरादार, जि.प.सदस्य संजीवकुमार सावंत, उपनगराध्यक्ष उमेश सावंत, आर. के. माने, कार्याध्यक्ष शिवाजीराव ताड, अध्यक्ष ऍड.बसवराज धोडमणी, मारूती पवार, रमेश बिरादार, सुनील पवार, श्रीकांत शिंदे, सौ. सुशिला होनमोरे, लक्ष्मणराव बोराडे, आकाराम मासाळ, विठ्ठल निकम, बाळ सावंत, प्रमोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संजीवकुमार सावंत म्हणाले, 16 तारखेला राष्ट्रवादीने जत ते सांगली अशी एक हजार मोटर सायकलींची रॅली काढली होती. या रॅलीला मिळालेला प्रतिसाद तसेच 4 एप्रिलला विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा पाहूनच जत काँग्रेसच्या छातीत धडकी भरली आहे. जगतापांचे वर्चस्व पाहूनच या मंडळींच्या पायाखालची वाळू घसरली असून, येनकेन प्रकारे राष्ट्रवादीला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. खरेतर 1988 सालीच विलासराव जगतापांनी म्हैसाळ पाण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी एक हजार लोकांना अटक करवून घेतली. हे पाणी त्यावेळी काँग्रेसवाल्यांना दिवास्वप्न वाटत होते. त्यांनी प्रतिमोर्चा काढून विरोध नोंदविला. परंतु आज म्हैसाळचे पाणी आल्यावर हीच मंडऴी श्रेयासाठी पुढे आली आहेत.
जत कारखान्या संदर्भात केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उलट सुरूवातीच्या काळात साडे पाच लाख टन उसाचे गाळप केले. कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न जगतापांनी केले. त्यासाठी सहा वर्षे करारांनी तो राजारामबापूला चालविण्यास दिला, त्यांनी दोन हंगाम यशस्वी चालविले. त्यानंतर मात्र जतच्या काँग्रेस मंडळींनी पालकमंत्र्यांना सांगून कारखान्यावर प्रशासक आणला. उमाजीराव सनमडकीर पाच वर्षे प्रशासक होते. त्यांच्या काळात एक कांड गाळप केले नाही. त्यांच्याच काळात कारखान्याचा लिलाव झाला. त्यावेळी ही मंडळी व त्यांचे मंत्री कुठे होते असा पलटवारही राष्ट्रवादीने केला.
इतकेच काय कारखान्यात यांची सत्ता येत नाही म्हणून उस कवठेमहांकाळला घालण्याचे षडयंत्र रचले, तसा प्रकारही केला. जतच्या विकासाचा मानबिंदू बंद पाडण्याचे पाप काँग्रेसनी केले आहे. शिवाय 40 कोटी कारखान्यावर कर्जे होते, ते शंभर कोटी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली. ज्या काँग्रेसवाल्यांना यंत्रमाग चालविता येत नाही, त्यांनी कारखान्यावर बोलू नये.
मोर्चा काय असतो माहीत आहे का
सभापती बसवराज बिराजदार म्हणाले, काँग्रेसवाल्यांना मोर्चा काय असतो हेच माहीत नाही. जतच्या प्रश्नासाठी विलासराव जगतापांच्या नेतृत्वाखाली शेकडो मोर्चे, आंदोलने, उपोषणे झाली. जनतेच्या प्रश्नासाठी ते आजवर तळमळीने लढले आहेत. मोर्चे आम्ही काढायचे. रस्त्यावर आम्ही उतरणार, प्रश्नांची अभ्यासू मांडणी आम्ही करायची आणि श्रेयासाठी काँग्रेस पुढे ही त्यांची जुनी पध्दत आहे. आतातर विधानसभा डोळय़ासमोर ठेवून हे लोक पालकमंत्र्यांना खुष करण्यासाठी बेताल वक्तव्ये करीत आहेत. ज्यावेळी पलूस कडेगावचे विभाजन झाले, त्यावेळी पालकमंत्री व जतची काँग्रेस कुठे होती. आता जतचा पुळका आणणारे व जतला दत्तक घेतले म्ह्णून सांगणाऱया पालकमंत्र्यांनी नियोजन समितीच्या निधीत का जतला खाली ठेवले याची खुलासा त्यांनी करावा असे सांगून जतच्या रस्त्यांसाठी त्यांनी 70 कोटी रूपये द्यावेत अशी मागणी सभापती बिरादार यांनी केली.
येळवीत दीशाभूल ः आर. के. माने
येळवीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुसऱयांदा उद्घाटन घेवून काँग्रेसनी दीशाभूल केली आहे. वास्तविक दिलीप वाघमोडेंच्या काळात आम्हीच पुढाकार घेवून हे केंद्र मंजूर करून घेतले होते. या केंद्राचे उद्घाटन विलासराव जगताप, जि.प.अध्यक्ष अमरसिंह देशमुख, बसवराज पाटील, संजय सावंत, सुनील पवार यांच्या उपस्थितीत झाले होते. आता याऐवजी एखाद्या नव्या कामाचे उद्घाटन केले असते तर ते शोभले असते असा टोला आर.के.मानेंनी लगावला आहे.
आबांचा मोठेपणा ः सुनील पवार
प.सदस्य सुनील पवार म्हणाले, विलासराव जगताप यांनी पुढाकार घेवून आर.आर.पाटील यांना प्रांत कार्यालयासाठी व म्हैसाळ योजनेसाठी आग्रह धरला होता. आबांचा मोठेपणा म्हणूनच जतला प्रांत कार्यालय मिळाले. प्रांत कार्यालयाचे गॅझेट होताना पालकमंत्री कुठे होते असे सांगून म्हैसाळच्या 42 गावांचा सर्व्हे करण्याचा आदेशही जगतापांच्या प्रयत्नांमुळे आबांनी दिला आहे.
आ. शेंडगे परतीच्या वाटेवर बोराडे
आ. प्रकाश शेंडगे हे आता परतीच्या वाटेवर आहेत, त्यामुळे त्यांनी कारखाना सभासदांचा होईल वगैरे केलेले वक्तव्य दीशाभूल करणारे आहे. चार वर्षात आमदार जतेत दिसले नाहीत. रविवार ते रविवार हा त्यांचा कार्यक्रम जनतेला कळला असल्याचे बोराडे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकाश जमदाडे लवकरच राष्ट्रवादीत येतील. त्यांनी यावे त्यांचे आम्ही स्वागत करू, असे सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा