सांगली परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील वि†िवध बातम्या, लेख, माहितीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ... फोन करा 8275592062
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१३
2014जत विधानसभेची जागा काँग्रेसलाच!
@डॉ. पतंगराव कदमांचे सूतोवाच
@आ. शेंडगेंनी आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केले
@कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
फोटो ः ना. डॉ. पतंगराव कदम यांचा वापरणे...ा
@ किरण जाधव / जत
2009 मध्ये पहिल्यांदाच खुल्या झालेल्या जत विधानसभेची जागा काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला गेली होती. त्यामुळे सष्टेंबर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा कोणाला मिळणार याकडे जतेच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असतानाच, राज्याचे वनमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी जतची जागा काँग्रेसलाच घेणार असल्याचा दावा केला आहे. श्रावण सोमवारी मिळालेल्या या गोड बातमीने जत काँग्रेसमध्ये चैतन्य आले असले तरी डॉ. कदमांच्या वक्तव्यामुळे जतेची राजकीय समीकरणे मात्र गतीमान होणार हे पक्के झाले आहे.
सोमवारी सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदमांनी दुष्काळी जतचा दौरा केला. जतला लागेल ती मदत करण्याचे अभिवचन देतानाच त्यांनी तोंडावर आलेल्या विधानसभेची जागा आता राष्ट्रवादी नव्हे तर काँग्रेसलाच घेणार असल्याचा बाँम्ब फोडून जतेच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली आहे. इतकेच काय आता जत काँग्रेसनी नेटाने कामाला लागावे, एकसंघ काँग्रेस कामाला लागली तर भविष्यात जतमधील सर्वच संस्थावर काँग्रेसचा झेंडा दिसेल, असे सांगून जतची जागा कुठल्याही स्थितीत सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खरेतर पालकमंत्री डॉ. पतंगराव कदमांच्या या वक्तव्यामुळे भविष्यातील जतेच्या राजकीय मैदानावरचे अनेक संदर्भ अधोरेखीत केले आहेत. राज्याच्या विधीमंडळात अनेक वर्षांपासून विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळणारे व राज्यातील वजनदार तथा ज्येष्ठ मंत्री म्हणून डॉ. पतंगराव कदमांचा मोठा दबदबा आहे. राजकारणात अनेकदा भाकीते करावी लागतात, त्याप्रमाणे सोमवारचे भाकीत डॉ. कदमांनी केले असले तरी त्याला तितकेच महत्व आहे. कारण जतेच्या काँग्रेसवर दादा घराण्यापेक्षा कदम घराण्याचे वर्चस्व अनेक वर्षांपासून आहे. जिकडे कदम तिकडे बहुतांशी जतची काँग्रेस हे देखील अनेकदा सिध्द झाले आहे.
शिवाय काँग्रेसच्या फादर बॉडीतील ज्येष्ठ नेते म्हणून पक्षातही त्यांचे मानाचे स्थान आहे. एकेकाळी जिल्हय़ातील सहा आमदारांचा भक्कम पाठींबा असणारे, मोहनराव कदमांना दोनवेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खेचून घेणारे व जतवर विशेष प्रेम दाखविणारे मंत्री कदम यांनी केलेले वक्तव्य नेहमीच्या स्टाईलने विसरून जाण्यासारखे अजिबात नाही. कारण मागच्या दोनेक वर्षांपासून डॉ. कदमांनी जतवर बारीक लक्ष केंद्रीत केले आहे. जत काँग्रेसचे शिष्टमंडळ सतत त्यांच्या संपर्कात असल्याचे विविध प्रश्नातून दिसून येते आहे. विस्कटलेली जत काँग्रेसची घडी ते बसवित आहेत. त्यामुळे जत विधानसभेची जागा काँग्रेस सहजा सहजी सोडेल असे वाटत नाही.
या दौऱयात त्यांनी 2014 च्या निवडणुकीचे अनेक संदर्भ जोडताना इथले कार्यकर्ते कसे आहेत, याचेही स्पष्टीकरण केले. जत काँग्रेसने मला सोडून कधीही विरोधाची भूमिका घेतली नाही. जिल्ह्य़ाची व तालुक्याची राजकीय बेरीज घालताना सुनीलबापू सारखा कार्यकर्ता मोठय़ा हिंम्मतीने सदस्यांना घेवून यायचा त्यामुळे मी त्याच्यावर रूसलो तरी तो माझा लाडका आहे. उमाजीराव सनमडीकरांच्या हाती नेहमीच तालुक्याचे नेतृत्व दिले. त्यांनीही हिंमतीने काम करून दाखवले. सनमडीकरांच्या पराभवामुळे तालुक्याचे नुकसान झाले. पी. एम. पाटील चांगला कार्यकर्ता आहे, पण जरा बिळुरातून बाहेर पडून तालुक्यात त्यांनी फिरले पाहीजे. सनमडीकर इथल्या कार्यकर्त्यांचे शेलारमामा आहेत. सारखं आजारी आजारी म्हणून आता थांबून चालणार नाही सनमडीकर नेटाने काम करा असा गोडीत आदेशही त्यांनी देवून टाकला.
दरम्यान, जत काँग्रेस आता चांगल्या वळणावर आली आहे. गटबाजीमुळे आपलेच नुकसान होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते एकोप्याने कामाला लागले आहे. त्यामुळे जतेत काँग्रेसला चांगले वातावरण तयार झाले आहे. खरेतर 2009 च्या निवडणुकीतच जर गटबाजी झाली नसती तर इथे काँग्रेसचा आमदार दिसला असता. पण माझेच जरा दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीला गेली. पण इथली काँग्रेसमंडळी लई बेरकी निघाली. त्यांनी पक्षाचे राजीनामे देवून भाजपाच्या प्रकाश शेंडगेंना आमदार करून दाखविले.
प्रकाश शेंडगे तंतोतंत वागले
2009 च्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे आमदार झाले तर त्यांनी काँग्रेस कमीटीच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे. निधीचे वाटप इथल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून करायचे असे ठरले होते. प्रकाश शेंडगे भाजपाचे असले तरी त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम केले नाही. काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी तंतोतंत काम केल्याचा श्रेणी एकचा शेरा शेंडगेंना देवून टाकला. पण 2014 ला अण्णांचे काय याबाबत ते अजिबात बोलले नाहीत. उलट जत काँग्रेस कमिटी सांगेल त्यालाच उमेदवारी देण्याचे डॉ. कदमांनी जाहीर केले.
एकुणच सोमवारच्या दौऱयात पालकमंत्री डॉ. कदमांनी जत काँग्रेसला चांगलेच रिजार्च केले आहे. जतची जागा काँग्रेसचीच ही गोड बातमी दिली. कृषी महाविदय़ालय जतलाच देण्याची ग्वाही देवून थेट मुख्यमंत्र्यांना फोनवरून बोलूनही घेतले. तालुक्याचे विभाजन लवकरच करण्याचे संकेत दिले. म्हैसाळमध्ये सर्व गावे समाविष्ट करण्याचा निर्णयही घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. इतक्यावर न थांबता त्यांनी 2014 च्या विधानसभेसाठी आपण भिलवडी वांगीपेक्षा जतच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेवू असे सांगून जत विधानसभेची तुतारीच वाजविली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा